Tuesday, December 20, 2011

महाशिवरात्री

माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी सर्व शिवभक्‍त शंकराची, म्हणजे शिवाची पूजा करतात. या निमित्ताने आपण शिवाविषयी काही माहिती करून घेऊया. आपल्या संस्कृतीत विविध देवता, त्यांच्या उपासना सांगितल्या आहेत. हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन इत्यादि मूलभूत तत्त्वे आहेत, तसेच ३३ कोटी देवता या तत्त्व रूपाने आहेत. त्यांतील प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. प्रत्येक देवतेची उपासना करून आपल्याला त्या त्या देवतेशी एकरूप होता येते. महाशिवरात्रीदिवशी शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असते. त्यामुळे त्या दिवशी शिवाची उपासना केल्यास त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो.

`महाशिवरात्री' म्हणजे काय ?
पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.

महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्‍वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्‍वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्‍तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.

शिवपूजेची वैशिष्ट्ये

१. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.
३. शिवपूजेत पांढर्‍या अक्षता वापरतात.
४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.
५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

शिव या शब्दाची उत्पत्ती

'शिव' या शब्दाविषयी काही माहिती करून घेऊया. 'शिव' हा शब्द `वश' या शब्दापासून अक्षरांच्या उलटापालटीने तयार झाला आहे. वश् म्हणजे प्रकाशणे. म्हणून जो प्रकाशतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाशी आहे. तो स्वत: प्रकाशित राहून विश्‍वालाही प्रकाशित करतो. शिव म्हणजे मंगलमय व कल्याणस्वरूप असे तत्त्व. शिव हा सत्त्व, रज व तम या तिघांना (त्रिगुणातीत करणारा) म्हणजेच अज्ञानाला एकत्रितपणे नष्ट करतो.

शिवाची इतर नावे

शंकर : शं करोती इति शंकर: । शं म्हणजे कल्याण व करोती म्हणजे करतो. जो कल्याण करतो, तो शंकर होय.

महाकालेश्वर : अखिल विश्वब्रह्मांडाचा अधिष्ठाता देव (क्षेत्रपालदेव) हा काळपुरुष म्हणजेच महाकाळ आहे. म्हणून याला महाकालेश्वर म्हणतात.

महादेव : परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण ज्ञान व परिपूर्ण साधना हे तीनही ज्याच्यात एकत्र आहेत, अशा देवास देवांचा देव म्हणजेच महादेव म्हणतात.

भालचंद्र : भाली म्हणजे कपाळी ज्याने चंद्र धारण केला आहे तो भालचंद्र. शिवपुत्र गणपतीचेही भालचंद्र हे एक नांव आहे.

कर्पूरगौर : शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे, म्हणून त्याला कर्पूरगौर असेही म्हणतात.

शिवाची काही वैशिष्ट्ये

शिवाची काही वैशिष्ट्ये

नाग

शिवाच्या अंगावर ९ नाग असतात. शंकराच्या डोक्यावर एक, गळयात एक, दोन दंडात प्रत्येकी एक दोन, मनगटात प्रत्येकी एक, कमरेत एक व दोन मांड्यात प्रत्येकी एक अशा नऊ ठिकाणी हे ९ नाग असतात.
गंगा

शिवाच्या डोक्यातून गंगा वहाते. गंगा म्हणजे ज्याच्यापासून गमन करतात असा ओघ. म्हणजे गं ग- गंगा यालाच शिवाच्या डोक्यावरून गंगा अवतरली असे म्हणतात. पृथ्वीवरील गंगा नदीत या आध्यात्मिक गंगेचे अंशात्मक तत्त्व असल्याने प्रदुषणाने ती कितीही अशुद्ध झाली, तरी तिचे पावित्र्य कायम टिकते, म्हणूनच विश्‍वातील कोणत्याही जलाशी तुलना केली, तर गंगाजल सर्वांत पवित्र आहे, असे जाणवते.

त्रिनेत्र

शंकर त्रिनेत्र आहे. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला, उजवा डोळा म्हणजे दुसरा दुसरा डोळा व भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्म-रूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. यामुळेच शंकर भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्य काळ या त्रिकालातील घटना पाहू शकतो.

चंद्र

शिवाच्या कपाळी अर्धचंद्र असतो. मानवरूपातील शिवाच्या हातात पुढील चार आभूषणे असून ती प्रतिकात्मक आहेत. १ डमरू २. त्रिशूळ ३. पाष किंवा मृग ४ परशु.

तांडवनृत्य

शिवाच्या दोन अवस्था मानल्या आहेत. त्यांतील एक समाधि अवस्था व दुसरी तांडव किंवा लास्य नृत्य अवस्था. लास्य नृत्यामध्ये हात मोकळे असतात व वेगवेगळया मुद्रा केल्या जातात. तंडून करून दाखवले ते तांडव, असे जाणून भरतादि मुनींनी ते नृत्य मानवांना शिकवले.

नंदी

नंदी म्हणजेच आनंदी. वृषभरूपातील नंदी हे शिवाचे वाहन आहे. त्याला शिव परिवारात महत्त्वाचे स्थान आहे. शिवाचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेतले जाते.

Monday, December 19, 2011

श्री दत्तात्रयांच्या आरत्यांचा संग्रह

आरती दत्तात्रयप्रभूची ।
करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥



आरती दत्तात्रयप्रभूची ।
करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥

श्रीपदकमला लाजविती ।
वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥
कटिस्थित कौपिन ती वरती ।
छोटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥
वर्णूं काय तिची लीला ।
हीच प्रसवली, मिष्टान्न बहु, तुष्टचि झाले,
ब्रह्मक्षेत्र आणि वैष्य शुद्रही सेवुनियां जीची ॥
अभिरूची सेवुनियां ॥ १ ॥

गुरुवर सुंदर जगजेठी ।
ज्याचें ब्रह्मांडे पोटीं ।
माळा सुविलंबित कंठी ।
बिंबफळ रम्य वर्णूं ओष्ठी ॥ चाल ॥
अहा ती कुंदरदनशोभा ।
दंडकमंडलू, शंखचक्र करिं, गदापद्म धरि,
जटामुकुट परि, शोभतसे ज्याची ॥
मनोहर शोभतसे. ॥ २ ॥

रुचिरा सौम्य युग्मह्रष्टी ।
जिनें द्विज तारियला कुष्टी ॥
दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी ।
केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल. ॥
दयाळा किती म्हणूनि वर्णू ।
वंध्या वृंदा, तिची सुश्रद्धा, पाडुनि बिबुधची,
पुत्ररत्न जिस देउनिया सतिची ॥
इच्छा पुरविली मनिंची ॥ ३ ॥

देवा अघटित तव लीला ॥
रजकही चक्रवर्ती केला ॥
दावुन विश्वरुप मुनिला ।
द्विजादरशूल पळें हरिंला ॥ चाल. ॥
दुभविला वांझ महिषी एक ।
निमिषामाजी, श्रीशैल्याला तंतुक नेला,
पतिताकरवी, वेद वदविला, महिमा अशी ज्याची ॥
स्मराही महिमा. ॥ ४ ॥

ओळखुनि क्षुद्रभाव चित्ती ।
दिधलें पीक अमित शेती ॥
भूसर एक शुष्क वृत्ती ॥
क्षणार्धे धनद तया करिती ॥ चाल. ॥
ज्याची अतुल असे करणी ।
नयन झांकुनी, सर्वे उघडितां नेला काशिस,
भक्त पाहातां वार्ता अशि ज्याची ॥
स्मरा हो वार्ता अशि ज्याची ॥ ५ ॥

दयाकुल औदुंबरि मुर्ती ।
नमितां होय शांतवृत्ती ॥
न देती जननमरण पुढती ।
सत्य हे न धर मनि भ्रांति ॥ चाल ॥
सनातन सर्वसाक्षी ऎसा ।
दुस्तर हा भव, निस्तरावया, जाउनि स्त्वर,
आम्ही सविस्तर, पूजा करुं त्याची ॥
चला हो पूजा करुं त्याची ॥ ६ ॥

तल्लिन होउनि गुरुचरणीं ।
जोडुनि भक्तराजपाणी ॥
मागे हेंचि जनकजननी ।
अंती ठाव देऊ चरणीं ॥ चाल. ॥
नको मज दुजे आणिक कांही ।
भक्तवत्सला, दीनदयाळा, परम कृपाळा, दास नित्य याची ॥
उपेक्षा करूं नको साची ॥ ७ ॥

Sunday, December 18, 2011

दत्त जयंती


दत्त जयंती

एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्‍ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्‍न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्त जयंती' म्हणून साजरा करतात.



दत्त जयंतीचे महत्त्व

दत्त जयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.



जन्मोत्सव साजरा करणे

दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्‍त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच 'गुरुचरित्रसप्‍ताह' असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप आणि आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख अन चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ अन डमरू शंकराचे प्रतीक आहे.



महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे. काही ब्राह्मण कुटुंबांत या उत्सवानिमित्त दत्तनवरात्र पाळले जाते आणि त्याचा प्रारंभ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून होतो.



`श्री गुरुदेव दत्त ' या नामजपाचे महत्त्व

पूर्वजांचा त्रास असल्यास दैनंदिन जीवनात उद्‌भवणार्‍या समस्यांची काही उदाहरणे खाली दिली आहेत, उदा. परीक्षेच्या वेळी आजारी पडणे, प्रामाणिकपणे अभ्यास करूनही अपेक्षित यश न मिळणे, नोकरी न मिळणे, घरात भांडण-तंटे, लग्न न होणे, लग्न झाल्यास पती-पत्‍नीचे न पटणे, पटल्यास स्वत:मध्ये कोणतेही शारीरिक व्यंग नसतांना मूल न होणे, मूल झाल्यास मतिमंद किंवा विकलांग होणे, अपमृत्यू, धंदा न चालणे, दारिद्र्य, शारीरिक आजार अशा समस्या उद्‌भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतिदिन 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप न्यूनतम (किमान) १०८ वेळा लिहावा. तसेच मोठ्यांना हा त्रास असल्यास रोज किमान १ घंटा तरी `श्री गुरुदेव दत्त' हा नामजप करावा. त्रासाच्या तीव्रतेनुसार हा नामजपाचा कालावधी वाढवावा.



दत्त अवतार - दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले व पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्‍वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले.



`श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार व `श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार होय. तसेच `माणिकप्रभु' तिसरे व `श्री स्वामी समर्थ महाराज' हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे `नेमिनाथ' म्हणून पहातात आणि मुसलमान `फकिराच्या वेशात' पहातात. दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत.



दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका व औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. दत्त हा `गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. `श्री गुरुदेव दत्त', `श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात. `दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे.



दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे - झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात व तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.

Sunday, December 4, 2011

पु. ल . यांचे सावरकांवरील भाषण

गेल्या शतकातील एक सत्यकथा



१५ ऑगस्ट१९८२ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही फिल्म्स डिव्हिजनचे काही कर्मचारी ध्वजवन्दनाकरिता फिल्म भवनात जमलो होतो. कार्यक्रम संपन्न होताच, दिल्लीला गेलेले आमचे एक सहकारी, श्री. प्रभाकर पेंढारकर तितक्यात तेथे उपस्थित झाले आणि त्यांनी माहिती आणि मंत्री श्री. वसंत साठे यांचा तातडीचा एक संदेश थापांना दिला – “सावरकर अनुबोधपटाचे चित्रीकरण लवकर सुरु करावे”. थापांनी ते पत्र वाचून माझ्यापुढे करत म्हणाले “गेट बिझी इमिजिएटली.”



१९७७ साली प्रारंभ झालेल्या या अनुबोधपटाचे कार्य १९८० साली गुंडाळण्यात आले होते आणि एकदम १९८२ मध्ये त्याला एकाएकी पुनश्च्य सुवर्णमुहूर्त लाभला होता. कुठेतरी वाचल्याचे आठवते, 'एखाद्या व्यक्तीचे तेजोमय भविष्य त्याच्या मृत्यूनंतरही ओसंडून वाहत जाते आणि मनाला विलक्षण आनंदाचा आभास देते.' अशा या उत्कंठित पार्श्वभूमीवर सावरकर अनुबोधपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झपाट्याने

झाली. प्रथम स्वातंत्र्यवीरांचे जन्मगाव भगूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, शिरगाव या क्रमाने चित्रीकरण करत आम्ही फेब्रुवारी १९८३ च्या दुस-या आठवड्यात अंदमानला पोचलो.



प्रथमपासूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल माझ्या मनात आदर असल्यामुळे, अंदमानात स्थायिक झालेले सावरकरभक्त, सेवानिवृत्त जेलर श्री. गोविंदराव हर्षे यांच्या सहकार्याने अंदमानचे कुविख्यात कारागृह आणि तेथील सावरकरांच्या कोठडीच्या चित्रीकरणाचे कार्य जोरात सुरु झाले. शनिवार दि. २६ फेब्रुवारी १९८३ च्या सकाळी शूटिंग चालू असतांना हर्षे म्हणाले, "आज सावरकरांची पुण्यतिथी. योगायोगाने विख्यात साहित्यिक श्री. पु. ल. देशपांडे यांचे वास्तव्य इथे आहे. मी त्यांना आज सायंकाळी इथे आमंत्रित केले आहे. अंदमान महाराष्ट्र मंडळाचे सर्व सदस्य आणि इथल्या नौदलामध्ये काम करणारे सर्व महाराष्ट्रीयन लोक इथे येणार आहेत. त्यामुळे आपण आपले शूटिंग दुपारनंतर बंद करुया. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाच्या दिवशी पु. लं.ची अंदमानच्या कारागृहात उपस्थिती म्हणजे आम्हा सगळ्यांना तो अति विलक्षण अनुभवाचा आणि आनंदाचा दिवस.



सायंकाळी कारागृहाच्या मुख्यद्वारी, अंदमान द्विपातल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी पु. लं.चे स्वागत केले. ७२ वर्षांपूर्वी १९११ मध्ये स्वा. सावरकरांना बंदी रुपात या तुरुंगात ज्या वाटेने घेऊन जाण्यात आले असेल, कदाचित त्याच पायवाटेने आज पु. ल. जात होते. कारागृहाच्या तिस-या मजल्यावरचे मोठे लोखंडी दर अति भयाण आवाज करीत उघडण्यात आले.समोर दोन भिंतींच्या मधोमध असलेला एक लांब पॅसेज थेट स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीपर्यंत जात होता. तो डोळ्यापुढे येताच पु. ल. गहिवरून गेले.भावनेने ओथंबून जाऊन ते उदगारले "तात्यांना इथे ठेवले होते?" त्यांचा गळा भरून आला होता. पुढे त्यांना काही बोलताच येईना.



सतत हसतमुख असणा-या आणि इतरांना हसवणा-या पु. लं.चे हे असामान्य रूप आम्ही पाहत होतो. हळहळत पुढे जात, पु. ल. त्या लोखंडी दारांच्या आंत, 'सावरकर कोठडीत शिरले. आमची गर्दी त्यांच्यामागेच, त्या १३ X ७ फुटांच्या कोठडीसमोरच होती. आमच्यांतल्या काहींनाच आत शिरता आले. तिथे त्या काळोखांत, भिंतीवर असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या तैलचित्राला पु. लं.नी पुष्पहार अर्पण केला आणि नतमस्तक होऊन आदराने नमस्कार केला. पुढे काही क्षण ते तसेच स्तब्ध होते. अशा या हृदयस्पर्शी वातावरणाला तेजोमय करण्यासाठी आमच्या गर्दीतल्या एकाने मोठयाने आरोळी ठोकली "वंदे मातरम"..."भारतमाताकी जय"..." स्वातंत्र्यवीर सावरकरकी जय".... आणि आम्ही सर्वांनी त्याला दुजोरा दिला.अशा आमच्या या घोषणांचा प्रतिध्वनी संपूर्ण कारागृहाच्या आवारांत घुमला. बहुतेक त्या कारागृहाच्या आयुष्यात प्रथमच अशा मुक्त, हौशी घोषणांचा दिलखुलास वर्षाव झाला असेल. पु. ल. भारावून गेले.सावरकर कोठडीच्या समोर, खाली अंगणात, जिथे ब्रिटीशांच्या काळांत कैद्याना फटके मारले जात, तिथेच पु. लं.चे भावनेने ओथंबलेले, स्फुर्तीदायक, स्वातंत्र्यवीरांच्या आदरांजलीला साजेल असे अविस्मरणीय साजेल असे अविस्मरणीय भाषण झाले.



ते भाषण जसेच्या तसे इथे देत आहोत -



मित्रहो,आजचा दिवस हा मी माझ्या आयुष्यातला परम भाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नसल्यामुळे मी त्याला पूर्वजन्माचा आधार देत नाही. पण माझ्या हातून कधीतरी काहीतरी असं घडलेलं असलं पाहिजे, की ज्यामुळे अशा प्रकारचा भाग्ययोग मला लाभला आहे. सावरकरांच्या प्रतिमेला आत्ताच आपण पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख नेहमी 'अंदमानातली कोठडी' असा केला जातो. परंतु ज्या वेळेला एखाद्या खोलीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येतं, त्यावेळेला त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आत्ता जिथे गेलो तो असाच एक गाभारा झालेला आहे. तिथे एक मूर्तिमंत तेज वावरत होतं. 'तेजस्विना वधी तमस्तु' असं आपण नुसतं म्हणत असतो. म्हंटलेलंही विसरून जात असतो. रोज म्हणत असतो.पण ख-या अर्थानं ज्यांची काय, वाचा, मन सगळंच तेजस्वी, ओजस्वी होतं अशी भारतीय इतिहासातील व्यक्ती शोधायची झाली तर प्रथम आपल्याला आधुनिक काळामध्ये वीर सावरकरांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. प्रत्येक क्षण हा जीवन उजळण्यासाठी आहे हे दाखवून देणारं त्याचं उभं आयुष्य होतं. ते अंधाराचे सर्वात मोठे शत्रू होते. मग तो अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा पारतन्त्र्यासारख्या गोष्टींनी आपल्यावर लादलेला असो. अंधाराविरुद्ध त्यांनी सदैव झुंज मांडलेली होती.



मनुष्यजीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तींशी सतत झुंज घ्यावी लागत असते. एक मनुष्य आणि निसर्ग, दुसरी मनुष्य आणि मनुष्य, अंतत: तिसरी झुंज म्हणजे त्याची स्वत:शीच, स्वत:च्या आत्म्याशीच चालू असलेली झुंज. प्रत्येकाच्या अंतर्गतच एक युद्ध चाललेलं असतं. त्याच अर्थानं तुकारामांनी म्हटलंय, 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'. कुठलंही युद्ध म्हटलं की त्याचा पाहिला नियम असा आहे की युद्ध खेळणं-यानं 'मी जिंकणारच' याच भावनेनं त्याच्यात जावं लागतं.



सावरकरांनीसुद्धा 'मारिता मारिता मरावे' याचाच पुनःपुन्हा उद्घोष केलेला होता. पराजयाच्या भूमिकेतून गेलेला मनुष्य कधी युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या विचारांचं सर काढायचं झालं तर असं दिसेल की केवळ राजकीय गोष्टींवरच हल्ला करा असं त्यांनी सांगितलं असं नाही, तर जिथे जिथे तुम्हाला अज्ञान दिसेल तिथे तिथे एखाद्या वीर पुरुषासारखे तुटून पडा असं त्यांनी सांगितलं. म्हणून वैचारिक दृष्टीने आधुनिक काळातल्या विज्ञानमहर्षींच्यामध्ये सावरकरांचं नाव आपण अतिशय आदराने घेतलं पाहिजे. विज्ञाननिष्ठा या विषयावरचे त्यांचे निबंध आपण वाचा, आणि 'विज्ञाननिष्ठा' का तर विज्ञान हे सतत अंधारावर मत करायला जात असतं म्हणून.



सर्व ठिकाणचा काळोख प्रकाशमान करण्याची गरज असते. काळोख याचा अर्थ भय, काळोख याचा अर्थ अंधश्रद्धा, काळोख याचा अर्थ आंधळेपण.सर्व ठिकाणचं अशा प्रकारचं यासाठी त्यांनी नुसती लेखणीच नाही, नुसती वणीच नाही, तर सगळं शरीरकाया त्यासाठी झिजवली. २६ फेब्रुवारी हा त्यांच्या "आत्मार्पणाचा" दिवस आहे असं आपण म्हणतो. त्यांच्याच शब्दात म्हणायचं तर 'जीवाना ध्वरि पडे आज पूर्णाहुती' असा आपला हिशोबाच्या दृष्टीनं आज त्यांच्या आत्मार्पणाचा दिवस असेलही. परंतू त्यांच्या वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून प्रत्येकच दिवस हा त्यांच्यासाठी आत्मार्पणाचाच दिवस होता. "आत्मार्पण' हा विचार त्यांच्या मनात आला नाही असा एकही दिवस नसेल. आपण मात्र पुष्कळसे लोक केवळ मरता येत नाही म्हणून जगात असतो.



आपल्या जगण्याला तसा श्वासोच्छवास घेणं यापलिकडे फारसा अर्थ नसतो. पण जिथे जिथे लोकांना गुदमारलेपणा जाणवतो, जिथे जिथे लोकांना मोकळे श्वास घेता येत नाहीत, त्या सर्वांचे श्वास मोकळे करण्यासाठी मला श्वासोच्छवास घ्यायचाय या भूमिकेतून जेव्हा माणूस जगतो तेव्हा तो ख-या अर्थाने पारमार्थिक असतो. टिळे, माळा लावून 'जय जय रामकृष्ण हरी' म्हणणारा पारमार्थिक आहे असं उगीचच आपण समाजात असतो. पण जीवनाचा परम-अर्थ कळावा याच्यासाठी झगडणारा मनुष्य, निसर्ग-माणूस आणि आपण स्वत:, ही सर्व कोडी उलगडण्याच्या मागे लागणारा मनुष्य हा पारमार्थिक म्हटला पाहिजे.



सावरकरांना या सेल्युलर जेलमध्ये प्रचंड शक्ती मिळाली. आज जरी आपण तिथे नुसते जाऊन आलो तरी भयाण वाटतं. आपण कल्पना करू शकता की त्या काळी ते असेच इथे उभे राहिले असतील. हे दृश्य पाहिल्यावर आपल्याला इथे ५० वर्षं काढायचीत याखेरीज दुसरा विचार कदाचित त्यांच्यासमोर नसेल. ब्रिटीश सत्तेला विरोध करणा-यांना, माणसासारख्या माणसांना मारणं हे ज्यांना लहान मुलांच्या खेळासारखं वाटत होतं अशांच्यात एव्हढी वर्षं त्यांना काढायची होती. तरीही मनात विश्वास बाळगायचा की या सगळ्या शृंखला गळून पडण्याचा एक दिवस येणार आहे. मित्रानो, त्यांनी त्या वेळेला सांगून ठेवलं होतं की एक दिवस येथे आमचे पुतळे उभे राहतील. हा काही अंधविश्वास नव्हता. त्यांना खात्रीच होती की ही परिस्थिती आम्ही बदलू शकतो. हा विश्वास येण्यासाठी त्यांनी विज्ञान दृष्टीनं जगाकडे पाहिलं होतं.



ज्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आम्ही अमृताचे पुत्र आहोत. एक दिवस मरण्यासाठीच जन्माला आलेले आहात असं सांगणारा नव्हे, तर 'अमृताचे पुत्र' आहात असं सांगणारा हिंदू धर्मच त्यांच्या डोळ्यापुढे असतो. घंटा वाजाव्यात तसे त्यांच्या मनाच्या गाभा-यामध्ये हेच विचार वाजत होते. त्यांना एक माहीत होतं की दुबळ्यांच्या वाटेला दैव कधीही येत नाही. प्रत्येक बाबतीतल्या दुबळेपणाचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. सामोपचारानं आणि काहीतरी थातूरमातूर करून राजकारण करणा-या मंडळींच्या बाबत त्यांनी 'महाबळ भट्टी' प्रयोग नको, अस एक शब्दप्रयोग केलेला आहे. आतलं शास्त्र काही कळलेलं नसताना जी नुसती पोपटपंचीच असते असा 'महाबळ भट्टी' प्रयोग नको, असं ते म्हणतात. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर पारखून जेव्हा एखादा माणूस घेत असतो तेव्हा त्याच्या दृष्टीने पराजय नसतोच.



मर्ढेकरांनीही आपल्या कवितेत म्हटलंय की 'भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी.' नुसतंच एखादी गोष्ट पाहून भावनाबंबाळ होण्याला काही अर्थ नाही. समजा हा सेल्युलर जेल पाहून मी डोळ्यात अश्रू आणून थयथया नाचायला लागलो आणि मला किती दु:ख झालंय हे सामान्यत: दोनशे माणसांना कळवणं म्हणजेच भावना असते असं नव्हे. उत्कृष्ट भावना तीच असते की, जिला आवर घालून त्यापुढचं कार्य करण्यासाठी बुद्धीची शक्ती मिळते. शास्त्रकाट्याची अशी कसोटी बुद्धीला लावणारे सावरकर होते.



अंदमान हे एका दृष्टीने तीर्थस्थानच झालेलं आहे. हे निराळ्या अर्थाचं तीर्थस्थान आहे.सावरकरांच्या इतकी विज्ञाननिष्ठा असलेले लेख फार कमी आपल्याला वाचायला मिळतात. खरं दुर्दैव हे आहे की आपण वाचतच नाही. मी आता काही तुमची परीक्षा घेणार नाही. पण इथे आलेल्यांना जर आपण विचारलं की तुम्ही कितीसे सावरकर वाचलेत, तर वाचलेत म्हणणारी फार थोडी मंडळी असतील. इथे याच जागी बसून, तुमच्यातच येऊन तुम्हाला नावं ठेवणं हे मला बरं वाटत नसलं, तरी एकेकाळी मी मास्तर असल्यामुळे असे लोक जमलेले दिसले की तशी खुमखुमी येते त्याला काय करणार! पण, सावरकर जितके तपशीलात, पुन्हा पुन्हा वाचत जाऊ, तसं आपल्याला दिसतं की या माणसानं एखाद्या ज्योतिषासारखी भविष्यं केलेली आहेत. आणि ज्योतिष्यासारखी, म्हणजे केवळ थातूरमातूर ज्योतिषासारखी नव्हे तर त्याचं गणित

मांडून केलेली भविष्यं आहेत. ५० वर्षांच्या शिक्षेसाठी आत जाणारा माणूस कशाच्या आधारावर म्हणत होता की, एक दिवस इथे आमचे पुतळे उभे राहतील?



त्यांना कळत होतं की माणसानं एकदा जिद्दीनं ठरवल्यानंतर कुणीही त्याच्या आड येऊ शकत नाही. ते त्यांचं म्हणणं खरं झालं.आत्ताच श्री हर्षे यांनी मला विनंती केली होती की सावरकरांच्याबद्दल व्यक्तिगत काहीतरी तुम्ही बोला. तुम्हाला खरं सांगतो, त्यांच्याजवळ जाण्याची

हिंमत सुद्धा मला कधी झाली नव्हती. सुर्याचं तेज नेहमी दुरूनच घ्यायचं असतं. त्याच्या फार जवळ गेलं तर आपण भस्मसात होऊन जाऊ. आम्ही सावरकरांना भेटत आलो ते त्यांच्या पुस्तकांतून, त्यांच्या ग्रंथांतून. पण माझ्या आयुष्यांत आणखी एक सुवर्णयोग आला होता. त्यांचा अमृतमहोत्सव झाला तेव्हा मी सावरकरांचं भाषण ऐकलं होतं. आमच्या लहानपणी पार्ल्याला सावरकर बरेच वेळा येऊन गेले, तेव्हाही त्यांची भाषणं ऐकली होती. 'गंगेसारखा ओघ' ही उपमा वक्तृत्वाला का देतात ते सावरकरांचं भाषण ऐकल्यावर कळतं.



सावरकरांनी किती त-हांची श्रीमंती आपल्याला दिली आहे! भाषेवरून मला आठवतंय, सावरकरांनी रूढ केलेले कितीतरी शब्द आपण वापरत असतो, ते आपल्याला माहीतही नसतं. सुरुवातीला जेव्हा ते आले, तेव्हा ते कसे काय रूढ होणार, म्हणून त्यांची चेष्टा झाली. परंतू ते सरकारी खात्याने रूढ केलेले शब्द नव्हते, तर एका प्रतिभावंत कवीने रूढ केलेले शब्द होते. या दोनात फरक असतो. 'मोले घातले रडाया' म्हणून सरकारात भाषाशुद्धीचे लोक बसवलेले असतात.इकडची डिक्शनरी घेऊन इकडे शब्द घाल, असं त्याचं चालू असतं. पण हा प्रतिभासंपन्न कवी होता. 'रिपोर्टर'चं भाषांतर करताना त्यांनी 'वार्ताहर' असं केलं.वार्तांचं, म्हणजे बातम्यांचं हरण करणारा, खेचून नेणारा, तो वार्ताहर...... इथे प्रतिभासंपन्न कवीची छाप दिसते. आज महाराष्ट्रात किंवा अगदी पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी सुद्धा 'मेयर' याच्यापेक्षा 'महापौर' याचा अर्थ लोकांना जास्त कळतो.



संपादक आणि वृत्तपत्रातले बाकीचे पदाधिकारी , त्यांची पदं हे सगळे आजचे रूढ शब्द सावरकरांनीच दिलेत. चित्रपट सृष्टीतल्या लोकांचे तर सगळे शब्द सावरकरच देत आहेत. दिग्दर्शक हा शब्द त्यांनी दिला., संकलक हा शब्द त्यांनी दिला. अशा त-हेने त्यांनी मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. आजही जर मुलांना ओघवती भाषा शिकवायची असेल, त्यांचं बोलणं जास्त चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे निबंध रोज मोठयाने वाचून घ्यावेत. म्हणजे वैचारिक दृष्ट्याही तो मुलगा मोठं होईल आणि भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीनेही तो मुलगा मोठं होईल.त्यांच्या लेखनात विलक्षण नाट्यमयता दिसून येते. सावरकरांचे मराठी भाषेवर किती थोर उपकार आहेत हे अनेकांच्या कदाचित लक्षात सुद्धा येणार नाही. सावरकर हे साक्षात महाकवीच होते.



शतजन्म शोधिताना शातअर्ती व्यर्थ झाल्या

शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या.



इतकी विराटकल्पना या 'स्पेस एज' च्या युगातसुद्धा आधुनिक कवींपैकी कुणी केल्याचं मला आठवत नाही. आमचं प्रेम कसं होतं, त्याचं वर्णन करताना त्यांनी या ओळी लिहिलेल्या आहेत. नुसती एक सूर्यमालिका आपल्या आवाक्यांत येत नाही, इथे हा महाकवी म्हणतोय - 'शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या'; एव्हढं पाहणा-या या महाकवीनं ब्रिटिशांच्या जेलमध्ये जन्मठेपेचा एक कैदी म्हणून इथे आल्यावर काय हाल सोसले ते आपण 'माझी जन्मठेप' मध्ये वाचलेलच आहे. पण माझी खात्री आहे की त्यांनी जेवढे हाल खरोखरच सोसले असतील त्याच्या एक दशांश सुद्धा त्याच्यामध्ये लिहिले नसतील. कारण त्यामुळे लोकांच्या मनात आपल्याबद्दल जराशी सुद्धा करुणेची

भावना उत्पन्न होईल असं त्यांना संशय आला असता, तरी त्या महापुरुषाला ते आवडलं नसतं. मला नेहमी वाटतं की झालेले सगळे हाल त्यांनी त्यांच्यात लिहिलेलेच नाहीयेत. उगीच कुठल्या तरी म्हातारीने ते वाचून 'अयाई, काय गं हे हाल' असं म्हटलेलं त्यांना नको होतं. उलट त्यांना ते वाचून 'असे हाल होतात काय, ठीक आहे, मग मीही ते सोशीन' असं त्यातून स्फूर्ती घेऊन हिंमतीने म्हणत पुढे येणारे तरुण हवे होते. त्यामुळे स्वत:बद्दल कणव निर्माण करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. वार्धक्याच्या काळात ते कुणाला भेटत नसत. इथे बाळाराव आहेत, त्यांच्या अगदी जवळ वावरलेले, त्यांना माहीत असेल नेमकं का ते. पण मला तरी असं वाटतं की आपल्या आयुष्यात थकलेल्या अवस्थेत आपल्याला कुणी पाहणं त्यांना कधी आवडलेलं नव्हतं. एखाद्या म्हाता-या सिंहालाही असंच वाटत असेल, की मला सर्कशीतला सिंह म्हणून पाहू नका, तर जंगलात ज्यावेळेला मी डरकाळ्या फोडत होतो त्यावेळेला हिंमत झाली असती तर माझ्यासमोर येऊन उभं राह्यचं होतंत.



ह्याच वृत्तीने जगल्यामुळे सावरकर त्यावेळी कुणाला भेटले नाहीत, तितकेच हसत हसत ते मृत्यूला सामोरे गेलेले आहेत.त्यांच्या विज्ञाननिष्ठेचं एकाच उदाहरण आपल्याला सांगतो. आपल्याकडे बाकी सगळ्या बाबतीत आपण पुढारलेपणा दाखवू शकतो.फक्त और्ध्वदेहिकाची जी काही पद्धत असते त्या बाबतीत आपण अगदी तर्कट असतो. आपल्याला भीती वाटत असते की जिवंतपणी तर बाप मानगुटीवर कायम बसलेलाच होता, आता न जाणो, मेल्यावरही बसायचा, म्हणून आपण ते सगळं करत असतो. ज्या सावरकरांना आपण धार्मिक, धर्मवादी, हिंदुत्वनिष्ठ......वगैरे वगैरे म्हणत दूषणं लावल्यासारखे बनवत होतो, ते सावरकर आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवतात की, 'मी मेल्यानंतर माझे शव विद्युतदाहिनीमध्ये झोकून द्यावे'. ते 'झोकून द्या' हा शब्द वापरतात. म्हणजे चक्क फेकून द्या. त्याला आता काहीही अर्थ राहिलेला नाही, असं त्यांना म्हणायचय. हे शंकराचार्यांसारखंच आहे. आद्य शंकराचार्यांच्या आईला उचलायला इतर ब्राम्हण येईनात. या छोट्या मुलाच्यानंही ते जड शव उचलवत नव्हतं. त्यावेळेला ते म्हणाले, 'हे तर काष्ठवतच झालेलं आहे'. - आणि म्हणून त्यांनी त्याचे तीन तुकडे केले, मग वाहून नेऊन त्यांनी त्याचं पुढे काय ते दहन केलं. विज्ञाननिष्ठेची हीच परंपरा सावरकरांनी दाखवली आहे. नाहीतर दुसरीकडे स्वत:ला 'सेक्युलर' म्हणवणारे पुष्कळ जण आपण मेल्यानंतर गंगेत काय करा, यमुनेत काय करा, आणखी कुठे काय करा वगैरे सगळं लिहीत बसलेले असतात.



यांना मात्र आम्ही सेक्युलर समजतो. असला सगळा तमाशा आपण नंतर करत असतो. ठाण्यातून एकदा मी मोटारीने जात होतो..... खरं तर आजच्या अशा प्रसंगी विनोदी किस्सा सांगू नये. पण तुम्ही मला बोलावलंय, तेव्हा मी माझ्या जातीवर जाणारच. राहवत नाही म्हणून सांगतो. - ठाण्यात त्या दिवशी जात असतांना पोलिसांनी माझी गाडी एकदा इकडे अडवली, एकदा तिकडे अडवली, एकदा तिकडे अडवली. मला काही कळेना का ते. मी विचारलं काय आहे हो हे? तर ते म्हणाले, उद्या या रस्त्यानं एका पुढा-याची रक्षा नेणार आहेत, त्याची ही रिहर्सल चाललीय. म्हटलं, मग रिहर्सलसाठी कुणाची रक्षा वापरताय? आडमार्गानं सुद्धा असं न करणा-या सावरकरांची थोरवी आपल्याला अनेकदा कळतच नाही. 'विद्युतदाहिनी' हा शब्दसुद्धा सावरकरांचाच आहे. तोच आता रूढ झालेला आहे. त्याच्यात माझं शव फेकून द्या, असं

ते म्हणतात. इतकंच नाही तर, त्यानंतर सुद्धा 'याचं स्वर्गात भलं व्हावं' या अर्थाचे मंत्र कुणी म्हणू नयेत असंही ते सांगतात.



ज्यांना कुणाला आपल्या मनाच्या समाधानासाठी काही गुणगुणावासं वाटेल त्यांनी हवं तर काही गुणगुणावं. पण माझं नंतरचं क्रियाकर्म कुणीही करू नये असं म्हणणारा अत्यंत 'रॅशनल' अशा प्रकारचा हा मनुष्य होता. अशा माणसाच्या बाबत अर्थीविपर्यास असंही पुष्कळदा घडत असतं. सावरकरांनी गाय ही फक्त एक उपयुक्त पशू आहे, असं म्हंटल्यावर 'गायीच्या पोटांत एकतीस कोटी देव आहेत' असं म्हणणारे लोक त्यांच्यावर केवढे भडकले होते! त्यालासुद्धा सावरकरांनी जे म्हंटलं, त्यानंतरचे सगळे अर्धवट वाचून त्यांच्यावर केलेले आरोप होते. ते जगातल्या कुठल्याही प्रकारच्या पावित्र्याला मान्यता देत नव्हते असं नव्हे. तर त्यांच्या दृष्टीने सगळ्या देशाचंच पावित्र्य महत्वाचं होतं. अहो, ज्या पुढा-यानं देव आणि धर्म यापेक्षा देश हीच संकल्पना सगळ्यांत मोठी मानली त्यांच्यापेक्षा दुसरा कुठला मोठा रॅशनल विचारच आधुनिक युगांत असू शकत नाही. त्यांचे विज्ञाननिष्ठेचे विचारच आपल्याला इथून पुढल्या जगात लागणार आहेत. त्याचं कारण;



आपल्याला यापुढे क्षणाक्षणाला विज्ञानयुगातच जगायचं आहे. त्याच्याशी जुळणारे जर आपले विचार नसतील तर चांगले सुशिक्षित, सुसंस्कृत असून सुद्धा आपण आजच्या आदीम जमातींच्या प्रमाणेच कुठेतरी फेकून दिले गेलेले, बावळट ठरू. अशा प्रकारच्या बावळटपणाचा सावरकरांना सदोदित तिटकाराच असे. त्यांना दीन, दुबळा, वाकलेला, लाचार मनुष्य सहनच होत नसे. हे कितीतरी वेळा त्यांच्या लिखाणात, त्यांच्या नाटकांत दिसून आलेलं आहे. 'तू तेजाचा पुत्र आहेस' हा संदेश सतत तुम्हाला त्यात सापडेल. त्या स्वाभिमानाचा नुसत्या उर्मटपणाशी संबंध त्यांना जोडायला नको होता. ज्याप्रमाणे लिंकनने म्हटलंय की, as I shall not be a slave, so I shall not be a master, ज्याप्रमाणे मी कुणाचा गुलाम होणार नाही, त्याप्रमाणे कुणाचा मालकही होणार नाही. 'जन्मठेपे'च्या सुरुवातीलाच असलेलं कदाचित आपण वाचलेलं असेल - त्या काळातही त्यांच्या डोळ्यासमोर कल्पना होती की सगळ्या जगाचं राष्ट्र एक व्हावं. इतकी विराट कल्पना घेऊन बसलेल्या माणसाला ब्रिटीशांचा साम्राज्यवाद किंवा आपल्या लोकांचा बावळटपणा सहन कसा होणार? आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणी ते य सगळ्याच्या विरुद्ध उभे राहिले.



नुसते उभे राहिले असे नाही, तर एखाद्या समिधेसारखा आपला देह त्यांनी त्यासाठी झिजवला. ती कृतकृत्यता त्यांच्या 'जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती' या शब्दातून दिसते. सावरकरांच्यासारखी माणसं जीवनाचा कधी निरोप घेत नसतात. ती अमर असतात. मृत्युन्जयच असतात. त्याचं एखादं वाक्य, एखादा शब्द, एखादी ओळ सुद्धा आपल्याला त्यांची आठवण करून दिल्यावाचून राहात नाही. माझ्या मते 'क्षण तो क्षणात गेलं, सखी हातचा सुटोनि' ही इतक्या श्रेष्ठ दर्जाची कविकल्पना आहे, की त्या एका ओळीकरता त्यांना नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे होता. त्यांच्या अशा एकेका निर्मितीमुळे ते चिरंजीव राहिलेले आहेत. आपण एवढंच बघायचं की, या प्रकाशातला एखादा तरी किरण आपल्या अंत:करणात पेटतो की नाही. आज त्या गाभा-यात पुष्पहार अर्पण करताना ज्याप्रकारे भरून आलं, ती भावना आपल्या मनात राहिली तर क्षूद्र गोष्टींनी आपण जे विचलित होऊन जातो, तिथे तरी आपण थोडे निर्भय होऊ शकलो तर बरं होईल. अशा निर्भयतेची उपासना करणं हेच तर आपल्या भारतीय संस्कृतीचं पहिल्यापासून स्तोत्र राहिलेलं आहे.



असं निर्भयातला निर्भय माणूस इथे जेलमध्ये हालअपेष्टा सोसत कुणासाठी राहिला? तुमच्या-माझ्यासाठीच राहिला नं? आज आपण मोकळेपणानं ज्या प्रकारे सहज म्हणून इथे येऊ शकतो आहोत ते सावरकरांच्या आणि त्यांच्यासारख्यांच्याच पुण्याईमुळे. त्या पुण्याईचं स्मरण आपण करतो म्हणून ती पुण्यतिथी असते. माणूस नुसतं मेला तर त्याचं दरवर्षीचं श्राद्ध म्हणजे पुण्यतिथी होत नाही. त्याच्या पुण्याचा जर काही वाटा आपल्यासमोर आलेला असेल तर ती पुण्यतिथी असते. सावरकरांच्याकडून आपल्याला स्वातंत्र्याचा, निर्भयतेचा वाटा आलेला आहे. स्वातंत्र्याच्या उपासनेबद्दल बोलायचं तर मी आत्तापर्यंत वाचलेल्या साहित्यातलं सर्वात सुंदर स्तोत्र म्हणजे -



'जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे........'



याच्याइतकं सुंदर स्तोत्र नाही.



माझ्या आयुष्यात अंगावर काटा उभं रहावा असं आणखी एक प्रसंग आला. सावरकरांनी ज्या अस्पृश्यांसाठी इतकी प्रचंड धडपड केली त्याच बांधवांच्याशी संबंधित एकाकार्यक्रमात मी गेलो होतो. सावरकरांनी अस्पृश्यांसाठी केलेलं काम आपल्याला माहीत असेलच - स्नेहभोजनं, मेळावे, पतितपावन मंदिर... असं मोठं काम त्यांनी मुख्यत: रत्नागिरीतून केलं होतं. त्या बांधवांचं काहीतरी चांगलं व्हावं, ते मोठे व्हावेत, शिकावेत, त्यांच्यातला भेद नाहीसा व्हावा यासाठी त्यांनी खूप धडपड केली. सांगलीजवळ म्हैसाळ नावाचं एक गाव आहे. तिथे आमचे एक मित्र मधुकरराव देवल यांनी ५० हरिजन कुटुंबांचा सहकारी शेतीचा एक प्रयोग उभं केलेला आहे. ज्या दलितांच्या घरातल्या बायका गरिबीमुळे, एकच फाटकं वस्त्र असल्यामुळे एकेकाळी घरातून बाहेर सुद्धा येत नसत, त्याच कुटुंबामधल्या बायका त्या दिवशी त्या

कार्यक्रमात जरीचे कपडे घालून आलेल्या होत्या. इतकी त्यांची त्या शेतीतून प्रगती झालेली होती. सभेला सुरुवात झाली. ते म्हणाले, या बायका आता गाणं म्हणणार आहेत. आजकाल गाणं म्हटलं की कुठलं तरी चित्रपटातलं गाणं असणार आणि मुळात जितकं भीषण गायलेलं असेल त्यापेक्षाही भीषण ऐकायला मिळणार, अशा अपेक्षेत होतो. म्हटलं, म्हणा. एकेकाळी घराबाहेर न पडणा-या आणि पडल्याच तर ज्यांची छी: थू होत होती अशा बायकांनी माझ्यासमोर गाणं कुठलं म्हटलं तर -



जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे



माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मनात आलं, हे गाणं ऐकायला माझे कान उपयोगाचे नाहीत, इथे साक्षात सावरकरच उपस्थित असायला हवे होते. म्हणजे त्याचं पुण्य कुठल्या काळात, कुठल्या ठिकाणी आणि कसं फळाला आलेलं आहे हे त्यांना पहायला मिळालं असतं. त्याचा एक क्षण जरी जरी त्यांच्या अनुभवाला आला असता तर चांगलं झालं असतं. त्याचं बीज असंही रुजलेलं आहे, त्यामुळे मारून, मरून किंवा विरुद्ध प्रचार करून ही माणसं कधी मरणारी नाहीतच. स्वयंभूपणानं ही वटवृक्षासारखी जगात असतात.



जे तीर्थक्षेत्र झालेलं आहे अशा ठिकाणी, अंदमानात आपण जमलेलो आहोत. तीर्थाची माझी अगदी साधी व्याख्या आहे. जिथे नुसत्या शरीराला स्नान घडतं त्याला आपण पाणी असं म्हणतो, पण मनाला ज्याच्यामुळे स्नान घडतं ते तीर्थ असतं. गंगेमध्ये शरीरही धुण्याची ताकद आहे आणि मनही धुण्याची ताकद आहे. म्हणून गंगा हे तीर्थ होतं. अशाच एका तीर्थस्थळी आपण जमलो आहोत. खरं म्हणजे प्रत्येक भारतीयानं इथे नतमस्तक व्हावं इतकं महान कार्य इथे घडलेलं आहे. सर्वच भारतीय भाषांमध्ये सावरकरांच्या विचारांची भाषांतरं कशी करता येतील, याचाही कार्यक्रम आपण हाती घेतला पाहिजे असं मी बाळाराव सावरकरांना म्हटलंच आहे. बाळारावानीही याचं कार्यासाठी आयुष्य वाहिलेलं आहे. त्यांना या कार्याला समर्थता लाभावी म्हणून आपल्यासारखी मंडळी त्यांच्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाहीत, असा मला विश्वास वाटतो. इथल्या पुण्याईला मन:पूर्वक अभिवादन करून मी थांबतो.

*जय हिंद ".



-------------------------------------

हरी ओम | श्रीराम | प्रणव उंडे | पुणे

-------------------------------------

Sunday, November 13, 2011

एक दु:खद ....

एक दु:खद ....
खालील लेखन स्वत: सुधीर फडके यांच्या जगाच्या पाठिवर या पुस्तकातील आहे . हे लेखन उपलब्ध केल्यामुळे राजहंस प्रकाशनाचे शतश: आभार.
लेखन पुढीप्रमाणे ...

आज हे लिहित असताना एका अतिशय खेदकारक घटनेचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. १९७७ मध्ये आकाशवाणी 'ने आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. त्यावेळी अनेक जुन्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. गेली कित्येक वर्ष मी ' आकाशवाणी 'चा प्रथम श्रेणीचा गायक आहे . गाण्याबरोबरच अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम मी 'आकाशवाणी 'वर सादर केले आहेत. सतत ५६ आठवडे सलग होणारा आणि प्रथमपासून शेवटपर्यंत वर्णनातीत लोकप्रियता मिळवणारा ,'आकाशवाणी 'च्या इतिहासातला एकमेव कार्यक्रम असा सानंद उल्लेख आकाशवाणीन आपल्या पाक्षिकात ज्या कार्यक्रमाचा केला आहे, त्या ' गीतरामायणा ' च्या दोन शिल्पकारांपैकी मी एक असूनही, या सुवर्णमहोत्सवाच्या समारंभासाठी माझ्यासारख्या चाळीस वर्षापासूनच्या कलाकाराची 'आकाशवाणी 'ला आठवण झाली नाही. साधे निमंत्रणसुधा माझ्याकडे आले नाही. यामुळे माझे नुकसान जरी काहीच झाले नाही, तरीपण खेद मात्र अवश्य वाटला. 'आकाशवाणी' वर माझी लोकप्रियता अवलंबून नाही. ती मी माझ्या गुणाने, कष्टाने,प्रामाणिकपणाने मिळवली आहे . ' आकाशवाणी ' कडून मला सत्काराची अपेक्षा नव्हती. पण आदरपूर्वक निमंत्रणाची अवश्य होती.



बाबूजी याचे हे लेखन मला पुस्तक वाचताना आढळून आले आणि मी लगेच येथे आणले आहे. तसेही बाबूजी याचे जीवन म्हणजेच ' जगाच्या पाठीवर ' या चित्रपटाची संकल्पना. आपल्यापुढे ही शोकांतिका आणताना मनात अनेक प्रश्न उत्पन होतात. अश्या दिग्गजांबरोबर आकाशवाणीने जो बाजार मांडला आहे तो कधी संपणार हे त्या विधात्यालाच ठाऊक !!!
पुनश्च एकदा राजहंस प्रकाशन, श्रीधर फडके व स्वत बाबूजी यांचे आभार. आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

Friday, November 11, 2011

चष्मेवाला


आठ नोव्हेंबर.. पुलंचा जन्मदिन!साहित्यविश्वात असा एकही दिवस जात नाही, की पुलंची आठवण काढली जात नाही. कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, विंदा करंदीकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगांवकर, राम शेवाळकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, मं. वि. राजाध्यक्ष, शांता शेळके, वसंत बापट अशा अग्रणींनी भाईंचे अष्टपैलुत्व उलगडून दाखविणारे लिहिलेले लेख पुलंच्या जन्मदिनी परचुरे प्रकाशन मंदिरतर्फे ‘तुझिया जातीचा। मिळो आम्हां कोणी।।’ या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन ८ नोव्हेंबर रोजी कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या हस्ते होत आहे. या पुस्तकात विजय तेंडुलकर यांनी उभे केलेले पुलंचे अनवट व्यक्तिमत्त्व..


बिर्ला मातुश्री सभागार. ओकीबोकी, रीत्या खुर्च्यांच्या हारींनी रेखलेली, धूसर काळोखानं भरलेली, भयाण स्तब्धतेनं व्यापलेली केवढी तरी पोकळी. केवढी तरी लांब, केवढी तरी रुंद. जणू राक्षसाच्या घरचा पेटारा आणि स्वप्नातल्या सात दालनांपलीकडे शिळा होऊन बसलेल्या राजकन्येसारखी ती अगदी टोकाला प्रकाशाच्या एकाच झोतानं उजळलेली पांढरीफेक साध्वी बिर्ला मातुश्री- पुतळ्याच्या निश्चलपणे चष्म्यातून दिवस-रात्र टवकारून पाहणारी. रीत्या रंगमंचावरून एकटेपणी सहज पाहावी, तो उरात कसनुशी धडकी भरविणारी. पोटात खड्डा पाडणारी. काळजाचा एखादा ठोका चुकविणारी.

- आणि मंद उकाडा.. एखाद्या उन्हात वाळवलेल्या आणि मग निववलेल्या पांघरुणात लपेटून बसावं, तसा आतून चुटपुटता बेचैन करणारा, पाठीच्या पन्हळीत घामाची ओली लव मधूनच उठवणारा. पंखे बंद. एअरकण्डिशनला सुट्टी. हे आड दिवसाचं, आड वेळेचं थिएटर. लग्नाविना मांडव किंवा रंग धुऊन बसलेली वारांगना. तितकंच ओकंबोकं, भयाण, असह्य, निस्त्राण. सारं अस्तित्व धुपून गेल्यासारखं. थकलेलं, मरगळलेलं, जडशीळ होऊन ओठंगलेलं, जीवन्मृत. उजेडाच्या आणि काळोखाच्या सीमा पार हरवून बसलेलं.

रंगमंचावर त्यामानानं बरी परिस्थिती दिसते आहे. पडदा दुभंगलेला आहे. दोन-चार प्रकाशझोत वेगवेगळ्या बाजूंनी येऊन लोळले आहेत. मागल्या बाजूला एका नृत्यनाटिकेचा ‘डेकोरेटिव्ह’ पडदा. रंगमंचावर एक ठसठशीत बाई दुसर्‍या एका फिक्या माणसाला काहीतरी समजावून सांगत आहे. त्या माणसाची दाढीच तेवढी लक्षात राहते. पलीकडे काही खुर्च्या, एक टेबल. आणि एक हाडकुळा स्काऊटमास्तर शिट्टी बोटांभोवती घुमवीत रेंगाळतो आहे. तीन बाया - यातली एक उंच- हातात कार्डबोर्डच्या ढाली घेऊन फिरताहेत, येताहेत आणि पुन्हा जाताहेत. डोक्याला पावसाळी थाबडी टोपी ‘फिट्ट’ केलेला, उंच, काटकिळा एकजण येतो आणि विचारतो, ‘‘भाई, हे ठीक आहे ना?’’
भाई नावाचा तो कुणीतरी- जाडा चष्मेवाला- ‘फर्स्ट क्लास’ म्हणतो आणि हा रंगमंच, हे थिएटर हे सर्व काही आपल्यासाठीच घडवलं असल्यासारखा इतस्तत: फिरत राहतो- आत्मविश्वासानं. सुखानं. अगदी रुची घेत घेत. कधी त्या ठसठशीत बाईच्या वाटाघाटीत भाग घेतो, तर कधी स्काऊटमास्तरशी कुजबुजतो आणि केव्हा नुसताच गुणगुणतो; स्वत:शीच, स्वत:साठीच. तेवढी क्षणमात्र-सारी नि:स्तब्धता त्या सुरावटीच्या फुलपाखरांनी अंतर्बाह्य मोहरून जाते. मुक्त, उत्स्फूर्त, बांधेसूद, प्रसन्न अशी सुरावट. कुणीतरी कुणाला तरी हाक मारतं. कुणीतरी प्रेक्षागृहातून कोल्हापुरी वहाणा वाजवीत जातं. कुठंतरी ठोक् ठोक् सुरू होते, आणि त्यातच कुणालातरी ढोलकीवर हलकी सम घेण्याची लहर येते..

तो जाडा चष्मेवाला आत्मविश्वास आता, एकीकडे त्या समेवर मान मुरडून नुकत्याच येऊन उभ्या राहिलेल्या कुणालातरी सांगतो, ‘‘शहाण्या माणसानं नाटक करू नये, चर्चा करावी.’’

तो उभा राहिलेला हसतो. वाटाघाटी करणारी ठसठशीत बाई उभी राहून समोरच्या ‘दाढी’ला रंगमंचावर कसल्यातरी जागा दाखवू लागते. दोन गडी रंगवलेली एक खोटी भिंत घेऊन रंगमंच ओलांडून जातात. एक चष्मेवाली कोपर्‍यातल्या बाकावर बसून काहीतरी आठवू लागते आणि पगडी घातलेला एक जाडा आपल्याच पगडीच्या शानीत येतो आणि इकडेतिकडे घुटमळत राहतो. रंगमंचावरून प्रेक्षागृहात आता एक झारदार मर्दानी लकेर सफाईनं उतरते आणि डाव्या अंगानं मागे निघून जाते. ‘‘हा लाला देसाई..’’- जाडा चष्मेवाला आत्मविश्वास.. नवख्या माणसाला सांगतो, ‘‘काय गळा आहे!’’

प्रकाशझोत विझतात. बदलतात. वाढतात. कमी होतात. चर्चा होते- ठसठशीत बाई आणि चष्मेवाला आत्मविश्वास. एक-दोघे सल्ला देतात; एक-दोघे नुसतेच पाहतात, ऐकतात. बाकड्यावरची विसरभोळी बाई आठवून आठवून कसल्यातरी नोंदी करते आणि उंच बाई पुन्हा एकदा निमित्त सापडल्यासारखी तरातरा येऊन जाते. एक टक्कलवाला गोरा गृहस्थ टपोर्‍या शुभ्र फुलांचा मोठा बांधीव गुच्छ आतून बाहेर आणि बाहेरून पलीकडे आत नेतो. मागे एक खुर्ची खाड्दिशी आपटते. त्यानिमित्तानं लक्ष पुन्हा मागे जातं आणि भास होतो, की हे सारं- रंगमंचावर आणि खालचं मिळून- एक स्वप्ननाटक आहे किंवा भासचित्र किंवा तसलं काहीही! पण हे खरं नव्हे.

पण मग तो चष्मेवाला आत्मविश्वास एकदम पृच्छा करतो- ‘‘रेडी एव्हरीबडी? सुनीता, वुई स्टार्ट नाव् अं!’’

क्षणभर जड शांतता. मग ‘‘ओ येस्..’’ ठसठशीत बाई ऊर्फ सुनीता.

‘‘कर्टन!’’ तो ओरडतो.

पडदा दोन्ही बाजूंनी येऊन एकसंध होतो. स्वप्ननाटक तात्पुरतं भंगतं. रंगमंच झाकला जातो. अंतरंग झाकलं जातं. आणि जणू एक लांब-रुंद दगडी चेहरा समोर उरतो. काहीही न सांगणारा. त्यासाठीच तो असतो- दर्शनी पडदा. काहीही न सांगण्याकरता. अपेक्षा निर्माण करण्याकरता. उत्सुकता ताणण्याकरता.
हजारो भुंग्यांनी गजबजल्यासारखं थिएटर. माणसांनी फुललेलं, रंगांनी खुललेलं. वेगवेगळ्या सुगंधांनी दरवळलेलं. धूसर प्रकाशाची धुंदी चढलेलं. पडद्यामागच्या वाद्यमेळानं भारलेलं. आणि प्रकाश आणखी धूसर होतो. अखेर नाममात्रच त्याचे कवडसे दूरदूरवर राहतात आणि दर्शनी पडद्यामागून शब्दांच्या गोंडस लकेरी बाहेर ओसंडू लागतात..

‘‘या या या या, मंडळी, या.. या, मंडळी, या.. या, या..’’

भाऊसाहेब, काकासाहेब, दादासाहेब, अण्णासाहेब, अक्कासाहेब, बाईसाहेब.. सार्‍यांचं भरभरून स्वागत. छोट्या बाळूचाही विसर नाही. पुरुषी आवाजाच्या जोडीला स्त्रीचा घरगुती, रेखीव शब्द.

- आणि निघतात सनईचे सूर.. ‘वराती’चा ‘मूड’ निर्माण करणारे.

पडदा दुभंगतो. आता प्रकाशाच्या नेमक्या फेकीनं उजळून निघालेली रंगमंचाची झगमगती चौकट समोर आकारते. मागे साधा निळा ‘कव्हर’चा पडदा.

‘वार्‍यावरची वरात’चं पालुपद आळवणारा संच आपलं काम करून विंगेत जातो आणि दुडक्या चालीनं एक स्थूल देह लोटल्यासारखा रंगमंचाच्या मध्यभागी येऊन कसाबसा थांबतो. तोच तो- चष्मेवाला आत्मविश्वास. ‘‘सुनीता, वुई स्टार्ट नाव् अं!’’ म्हणणारा. ‘कर्टन’ची सूचना देणारा. मनानं रंगमंचाची रुची घेत, सुरांच्या चोरट्या लकेरी उडवीत त्या दिवशी इतस्तत: वावरणारा. ‘शहाण्या माणसानं चर्चा करावी, नाटकं करू नयेत..’ त्याचे शब्द.. नाटकंच करावीत, ज्यांच्यापाशी तेवढी धमक असते ते नाटकंच करतात, चर्चा करीत नाहीत, असं बजावणारे..

त्याच्या पहिल्याच पावलाला प्रेक्षागृहात हास्य खळबळू लागतं आणि पहिल्या वाक्याला त्याचा मोठा स्फोट होतो- ‘‘आता इथून गेलं ना, ते घोडं आमचंच!’’

बराच वेळ साथ जमवून आणि नोमतोम करून गवयानं अखेर पहिल्या समेवर आदळावं, तसा सारा कार्यक्रम इथं गच्चदिशी समेवर आदळतो आणि हुशारला प्रेक्षक सावरून बसतो. रंगमंचावरून चष्म्याच्या भिंगांवाटे भुवया किंचित आक्रसून पाहणार्‍या शोधक नजरेला हवं ते सापडतं आणि दुणावल्या आत्मविश्वासानं, घरगुती सहजतेनं आणि अंगच्या जिद्दीनं पुढली वाक्यांची फेक चालू होते. हशांच्या पावत्या घेऊ लागते. आपण निर्माण केलेल्या वल्लींना सामोरी होऊन आपल्यावरचे आपलेच विनोद रंगमंचावरची ही चतुर आणि कसबी वल्ली अंगावर घेऊ लागते. उठणार्‍या हशांनी प्रफुल्लित होऊ लागते. मनाजोगत्या न उठणार्‍या हशांची कारणं तिरकस नजरेनं प्रेक्षकांत शोधू लागते. वाद्य मनाजोगतं बोलावं म्हणून बजवय्याचा अट्टहास, तसा समोरच्या प्रेक्षकांबद्दल जणू या चष्मेवाल्याचा अट्टहास. समोरचा प्रेक्षक मनाजोगता ‘बोलू’ लागेपर्यंत आपल्या विनोदाच्या तारा पिळण्याची त्याची खटपट. परंतु ती करताना मुद्रेवर तोच आरंभीचा लटका बावळटपणा, शब्दांच्या फेकीत तीच मुलायम सहजता. आवाजात मार्दव, जिवणीवर चोरटं स्मित आणि चष्म्याआडच्या डोळ्यांत मात्र शोधक अस्वस्थता.

होता होता तपकिरीचा किंचित साहित्यिक एजंट अंतर्धान पावतो. एका व्याख्यान समारंभाची आठवण जागी केली जाते आणि पाठोपाठ त्या व्याख्यानाशीच आपण पोहोचतो. ‘कव्हर’चा निळा पडदा बाजूला झाला आहे. एखाद्या आडगावच्या व्याख्यान समारंभाचा मालमसाला समोर मांडला आहे. पाच-सात बाप्ये, तीन-चार बाया, मागे एका काल्पनिक संस्थेचा ‘बॅनर’ आणि टेबलामागच्या ‘महत्त्वा’च्या खुर्चीत स्वत: सर्वाचा लाडका चष्मेवाला. आता कार्यक्रम चांगलाच ‘तापला’ आहे. रंगमंचावरच्या त्या दृश्यावर- त्यातही त्या टेबलामागच्या खुर्चीवर शेकडो नजरा खिळल्या आहेत; दुसरं-तिसरं काही नाही, मुबलक हसू मागणार्‍या. जिवण्या विलगल्या आहेत, माना उंचावल्या आहेत, हात घट्ट जुळले आहेत, श्वास जडावले आहेत. पोटात कुठंतरी हसण्याची निकड दुखते आहे आणि स्वागतपर पद्यवाल्या बावळट बायांच्या हातांतल्या कार्डबोर्डच्या ढालींवरची ‘सुस्वागतम्’ या अक्षरांची बायांप्रमाणे उलटापालट होऊन प्रत्यक्षात ‘सासुगंमत’ किंवा या प्रकारचं काही समोर दिसू लागताच प्रेक्षकांची पोटं पुन्हा फसफसू लागतात आणि हास्याचे टोलेजंग मजले उठू लागतात. चष्मेवाला मागे खुर्चीत बसून ही आपली ‘कर्तृक’ संतुष्ट नजरेनं पाहत असतो. आता प्रेक्षक त्याच्या मनासारखे ‘बोलू’ लागलेले असतात. वाक्या-वाक्याला हशा उसळत असतो. एका हशातून दुसरा हशा निघतो. हास्याचे नुसते कल्लोळ प्रेक्षागारात उठत-फुटत असतात. आणि मधून मधून यात वाक्य लोपून केवळ त्यावरचा हशाच- खरं म्हणजे स्फुंदून स्फुंदून उठत राहतो.

हा ‘व्याख्यान समारंभ’ जरा लांबतोच; परंतु प्रेक्षकाला त्याची दखल नसते, भान नसतं. दखल असते- घड्याळांना आणि चष्मेवाल्याला. त्याच्या मनात काटछाटीचे विचार सुरूदेखील झालेले असतात. आक्रसल्या भुवयांखालची नजर पुढ्यातल्या पाठमोर्‍या ‘समारंभा’वर यादृष्टीने फिरूदेखील लागलेली असते. त्यातल्या ‘जागा’ हेरू लागलेली असते. पुढल्या अभंग, पोवाडा आणि लावणी गायनात तो साथीदारांसह घुसतो, तो बहुधा हाच विचार मनात घोळवीत. तो गातो, लचकतो, मुरडतो आणि मग शेवटी चक्क वारकरी बनतो. मागे-पुढे उडू, नाचू लागतो. वारकर्‍यासारखा रंगतो, रंगवतो. ‘ब्रह्मानंदी’ पोहोचलेला वाटतो. ‘वरातीमागलं घोडं’ शोधीत लोटत, लडबडत रंगमंचावर आलेली त्याची ती पावलं इथे हलकीफुल होऊन ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात नुसती नृत्य करू लागलेली दिसतात. स्थूल काया पिसासारखी हलकी झालेली असते. रोमरोमांत लय भरलेली असते आणि प्रेक्षागारातदेखील ती फिरू लागलेली असते.. साक्षात् इंद्रायणीचा काठ थिएटरात क्षणभर अवतरतो.. विठूचा गजरदेखील कानी येत राहतो.. मघाचचा चटोर चष्मेवाला तो हाच की काय, असा साक्षात् प्रश्न कुणाला पडावा.. परंतु हा तोच!.. हा ‘बटाट्याच्या चाळी’तलाच; पण ‘चिंतन’शील चष्मेवाला, ‘तुका म्हणे’, ‘भाग्यवान’, ‘तुझे आहे तुजपाशी’मधला भावुक, अंतर्मुख चष्मेवाला.. ‘जोहार मायबाप’ चित्रपटात चोखामेळा बनून अक्षरश: भक्ती जागलेला चष्मेवाला.. हा ‘कृष्णाकाठचे कुंडल’मधला परंपरेचं ऋण साक्षात रक्तात वागवणारा चष्मेवाला.. सुरांत रंगणारा, लयीत विरघळणारा कलावंत.. आणि तरीही मघाचाच, किंचित्काल- आधीचाच चटोर, चावट, मिश्किल, वर वर बावळट, पण अगदी हिशेबी चष्मेवाला.. दोन्ही एकच.. हीच तर किमया.. यासाठीच तर विठूचा गजर!..

संपलं. गजर ‘विंगे’त निघून जातो आणि रंगमंचावर पाहता पाहता वारकऱ्याचा विनोदी लेखक होतो- चष्मा सावरत खेडवळ जीवनाच्या या रम्य काल्पनिक चित्राच्या पाश्र्वभूमीवर आजच्या खेड्याचं विदारक चित्र रंगमंचावर बोलावतो आणि त्यात स्वत:ची कुचंबणा आणि किंचित विटंबनाही हौसेनं करून घेतो. विदारकता हास्याच्या कल्लोळात बुडाल्यासारखी वाटते, बोध बालिश मनोरंजनात हरवतो की काय, असं होतं; पण तेच अभिप्रेत असतं. पदवीनं प्रोफेसर असला आणि व्यवसायानंही काही काळ प्रोफेसर म्हणून जगला असला तरी हा चष्मेवाला रंगमंचाचं ‘व्यासपीठ’ करू इच्छित नाही. किंबहुना व्यासपीठाचा रंगमंच करणं त्याला अधिक पसंत. सूर, लय, नाट्य, हास्य हेच त्याचं क्षेत्र. विशेषत: हास्य. ‘विठू’च्या गजराच्या लयीनं क्षणमात्र भरलेलं, भारलेलं थिएटर पाहता पाहता हास्याच्या उकळ्यांनी उतू जाऊ लागतं आणि हा अमृताहून गोड भासणारा नाद श्रुतींत भरभरून घेत चष्मेवाला पुढल्या इरसाल ‘साक्षी’च्या ‘वन मॅन शो’ची मानसिक तयारी करू लागतो. त्यासाठी ‘फुरफुरू’ लागतो. सारं काही हिशेबाबरहुकूम चाललेलं असतं; थोडं जास्तच.. अपेक्षेपेक्षा अधिक.. क्वचित अनपेक्षित जागांवर हास्याचे भुसनळे फुटतात.. अपेक्षित जागा येण्याआतच प्रेक्षागृह हास्यानं तुडुंब भरून जातं.. आणि अपेक्षित जागा मूळ अपेक्षा तोटकी ठरवतात.. उठलेला हास्यकल्लोळ एकेकदा थांबत नाही, थांबतच नाही. थांबणारदेखील नाही- कधीच थांबणार नाही- असं क्षणभर वाटतं.. थिएटर कोसळणार असं वाटतं.. वाद्यातून बोल काढणार्‍या वादकाला वाद्य आपसूक बोलू लागलेलं दिसावं, म्हणजे त्याच्या काळजात क्षणमात्र जे लकलकेल, मनात क्षणभर जे सरकून जाईल, ते अशावेळी कदाचित या चष्मेवाल्याच्या संवेदनक्षम, कुशाग्र मनात क्षणभरच, पण- दाटत असेल का? सूत्रधाराचा, कर्त्यांचा आत्मविश्वास आणि हिशेब अशा क्षणी पुरता लोपत असेल आणि कर्तुमकर्तुम् आदिशक्तीपुढं युगानुयुगे लीन होत आलेला नगण्य, क्षुद्र, असहाय, मूढ मानव- तेवढाच कदाचित एक क्षणभर उरत असेल..

पण नस्त्या कल्पना नकोत! तो पाहा, चष्मेवाला एखादं नर्मविनोदी वाक्य टाकून हास्याची पावती वसूल करण्याकरता चष्म्याच्या भिंगांतून किलकिल्या डोळ्यांनी पाहत अडून राहतो आणि ती मिळाल्यावरच पुढं जातो आहे.. हास्याची लाट ओसरत असल्याचं जाणवताच केवळ एखाद्या हालचालीनं किंवा आविर्भावानंदेखील मुक्त, खळाळतं हास्य निर्माण करतो आहे.. प्रेक्षक ‘बोलणं’ ही त्याची या क्षणी एकमेव आवड आहे. त्याच्या मनमोकळ्या, अगदी पाशवी हास्याचा नाद ऐकणं ही त्याच्या कानांची भूक आहे. त्या हास्याच्या वादळी समुद्रात मजेनं पाय चुळबुळवीत किनार्‍यावर बसून तृप्त होणं हा त्याचा आनंद आहे.. ही जिद्द आहे.. धुंदी आहे.. आणि हे सारं त्याला साध्य आहे.. अगदी हात जोडून सेवेला उभं आहे.. हुकमेहुकूम.. क्षणमात्र होईल ही लाट त्याच्यावर स्वार.. किंवा तसा भास होईल.. पण एरवी तोच लाटेचा स्वामी आहे. तोच याक्षणी त्या रंगमंचाचा आणि शेकडो धडाडती काळिजं सामावणार्‍या या प्रेक्षागृहाचा स्वामी आहे.. तोच त्या प्रकाशाचा आणि अंधाराचा स्वामी आहे..

मध्यांतर. विद्युद्दीप उजळतात आणि ‘बाहेर सगळी व्यवस्था आहे.. जे लागेल ते- तितकं विकत घेऊन खा, अनमान करू नका,’ म्हणून सांगणारा तो आर्जवी, गोंडस आवाज त्याच्या धन्यामागोमाग अंतर्धान पावतो. समोर पुन्हा तो एकसंध दर्शनी पडदा.. नव्यानं अपेक्षा चाळवणारा, उत्कंठा ताणणारा.. मख्ख! कुणीतरी कुणालातरी म्हणतं, ‘‘करमणूक म्हणून ठीक आहे..’’

- आणि कुणी आणखी कुणाला बजावतं- ‘‘ग्रेट!’’

चष्मेवाला. घर- बिछायतीवर लोळलेला. चिंतनमग्न. जवळ सवयीनं पेन, कागद. टीपॉयवर सकाळची वर्तमानपत्रं. यांतल्या एक-दोनांत तरी ‘वराती’ची समीक्षणं. एखादी सनसनाटी बातमी छापावी, तशी गरमागरम. फोन सारखा वाजतो आहे. लोक तिकिटं किंवा कंत्राटं मागतात किंवा अभिनंदन करतात. हे सारंच कंत्राट सुनीता नामे ठसठशीत बाईकडे सुपूर्द. अगदी तहहयात.

पोस्टमन पत्रं आणून टाकतात. सगळी अभिनंदनाची, स्तुतीची, कौतुकाची. व्याख्यानांची निमंत्रणं, प्रस्तावनेची गळ, लेखासाठी विनंत्या, कथाकथनासाठी विचारणा, ग्रंथप्रकाशनाची मागणी, इत्यादी लफडी त्यांत बहुधा असतातच. परंतु-

‘‘आमच्या आयुष्यात तुम्ही खरेच आनंदाची हिरवळ निर्माण केलीत..’’
‘‘तुमच्या वरातीनंतर आता दोन महिने सगळे करमणुकीचे कार्यक्रम रद्द..’’
‘‘तुमचा कालचा कार्यक्रम भलताच हास्यास्पद वाटला.. इतका मी कधीच हसलो नव्हतो..’’
‘‘ही वाईची दुर्गी कोण?..’’

हे नमुने तूर्त फार..

भेटायला मित्रमंडळी येतात आणि कालच्या कार्यक्रमाच्या घोळघोळून आठवणी काढतात.. आठवणीनंही गुदगुल्या झाल्यागत हसत राहतात.. त्याआधीच्या कार्यक्रमाशी तुलना करतात..

फोटोग्राफर अल्बम घेऊन येतो. कार्यक्रमाचे फोटो. गदगदून हसणारे यशवंतराव, टाळी देणारे बाबूराव, अक्षरश: घोड्यासारखा खिदळणारा कोणीतरी आणखी ‘राव’, डोळ्यांत पाणी जमेस्तोवर हसून दमलेल्या आयाबाया, जागच्या जागी उशा घेणारी पोरंटोरं, न हसवल्यानं डोळे मिटून हसत बसलेला संपादक, एरवी भारदस्त, गंभीर, विचारमग्न, चिंताग्रस्त, लांब दिसतील असे कित्येक हसरे, खुलले चेहरे, या सार्‍या गदारोळात न हसण्याचा तोंड दाबून प्रयत्न करणारा कोठल्यातरी बँकेचा काळा चष्मेवाला मॅनेजिंग डायरेक्टर.. आणि उरलेला सगळा आपला चष्मेवाला.. रंगमंचावर, रंगमंचामागे, कोणातरी बरोबर, एकटा, डोक्यावर फडकं गुंडाळलेला, पोटाला अ‍ॅप्रेन बांधलेला. पेटी वाजवताना, गरबा खेळताना, उड्या मारताना, थुंकताना, मेंदीनं हात माखलेल्या सौ.च्या तोंडाशी फोनचा घसरता रिसीव्हर धरताना, रामागडय़ाशी चार सुख-दु:खाच्या गोष्टी करताना, लावणी म्हणताना, अभंग नाचताना..

बिछायतीवरचा चष्मेवाला हे सारे फोटो किलकिल्या डोळ्यांनी आणि आक्रसल्या भुवयांनी न्याहाळतो. पाय जरा जास्त ताणतो. ‘डब्बल’ जिवणी थोडी हलवतो. मग खूश होऊन बोटांनी पोटावर ठेका धरीत एक सुरावट सिगारेटच्या धुरासारखी सोडून देतो आणि हाकारतो, ‘‘सुनीताबाई, आणखी दोन कप चहा टाका.’’

कुशीदेखील वळण्याची तसदी तो घेत नाही. तूर्त वळण्याची आवश्यकता नसते.

Wednesday, October 26, 2011

Thursday, October 6, 2011

नवरात्र - महत्व

नवरात्रीमागील इतिहास

१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.

नवरात्रीमागील महत्त्व

१. `जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.

`उपांग ललिता' ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.

२. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात `श्री दुर्गादेव्यै नम: ।'' हा नामजप जास्तीतजास्त करावा.

घटस्थापना

घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्‍ती) मिळते.

अखंड दीपप्रज्वलन करणे

दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.

नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे :

नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.

देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?

अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी
ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

कुमारिका-पूजन कसे करावे ?

१. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. `नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी `नऊ'' या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.

२. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे.

३. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.

४. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.)

५. कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.'

देवीपूजनाच्या वेळी शक्‍तीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळया

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. शक्‍तीतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे देवीला शेवंती, निशिगंध, कमळ इत्यादी फुले वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही शक्‍तीतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते; म्हणून अशा आकृतीबंधांनी युक्‍त रांगोळी काढतात. (असे काही आकृतीबंध पुढे तक्‍त्यात दिले आहेत.)


`गरबा खेळणे'' म्हणजे काय ?

गरबा खेळणे'' यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्‍तीयुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.

जय साईराम


अगाध शक्ती अघटीत लीला तव सदगुरुराया |
जड्जीवाते भवि ताराया तू नौका सदया ||

वेणीमाधव आपण होऊनी प्रयाग पद केले |
गंगा - यमुना द्वय अन्गुष्टी प्रवाह दाखविले || १ ||

कमलोदभव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती |
तूची होऊनी साईसमर्था विचरसी भूवरती || २ ||

प्रहर दिसाला ब्रह्मसम ते न्यान मुखे वदसि |
तमोगुणाला धरुनी रुद्ररूप कधी कधी दाखविसी || ३ ||

कधी कधी श्रीकृष्णासम त्या बाललीला करिसी |
भक्तमनासी सरस करुनी मराळ तू बनसी || ४ ||

यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा |
हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा || ५ ||

धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी |
फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी || ६ ||

तवौकसाते मशीद म्हणू तरी वन्ही ते ठाया |
धुनीत सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया || ७ ||

सकाळपासुनी भक्त साबडे पूजन तव करिती |
माध्यानीला दिनकर येता होत असे आरती || ८ ||

चहू बाजूना पार्षदगणसम भक्त उभे राहती |
चौरी चामरे करी धरुनी तुजवरी ढाळीती || ९ ||

शिंग कड्याळे सूर सनय्या दणदणते घंटा |
चोपदार ललकारती द्वारी घालूनिया पट्टा || १० ||

आरतीसमयी दिव्यासनी तू कमलावर दिससी |
प्रदोषकाळी बसुनी धुनिपुढे मदनदहन होसी || ११ ||

अशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्यही तव ठायी |
प्रचीतीस येताती आमुच्या हे बाबा साई || १२ ||

ऐसे असता उगीच मन्मन भटकत हे फिरते |
आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते || १३ ||

अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया |
आलो निवारा दासगणुंचे त्रिताप गुरुराया || १४ ||

जय साईराम. आज साईनी निर्वाण होऊन फार मोठा काळ गेला पण साई आजही आपल्यात आहेत आणि ते प्रत्येकाला साथ देत आहेत.जेथे जेथे प्रेम,सत्य आणि आनंद आहे तिथे साई आहेतच.साईचा आशीर्वाद आपल्यासमवेत असाच राहो हीच सद्गुरुचरणी विनम्र प्रार्थना.
राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज कि जय ||

Sunday, July 10, 2011

आषाढी (देवशयनी) एकादशी




इतिहास
पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात.

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' म्हणण्याचे कारण :
मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्यां कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात.

आषाढी एकादशीचे महत्त्व :
देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तीं पासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.

पूजाविधी :
या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर' या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

पंढरपूरची वारी :
वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.

श्री विठ्ठलाला तुळस आणि मंजिरींचा हार का वहातात ?
तुळस

तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो.

तुळशीची मंजिरी
मंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णुतत्त्वाला जागृत करणारी आहे. तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणार्याष चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल, तसे त्याचे विष्णुतत्त्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्गुणस्वरूप चैतन्याची अनुभूती येते.

मंजिरींचा हार
श्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरींचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रिया-शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.

पंढरपूरची काही वैशिष्ट्ये
‘पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्राला ‘महायोगपीठ’ म्हटले आहे. (त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणारे ‘पांडुरंगाष्टकम्’ सुद्धा म्हटले आहे.) पंढरी हे क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील रासक्रीडेचे गोकुळच आहे. यासंदर्भात पुराणांत निरनिराळ्या कथा आहेत.

चंद्रभागा :
पंढरपूरला जी ‘चंद्रभागा’ आहे, ती भीमाशंकरच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे ‘भीमा’ झाली. तीच पंढरपुरात मांड खडकापासून विष्णुपद स्थानापर्यंत पाऊण मैल चंद्रकोरीप्रमाणे वहाते; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते.’

लोहतीर्थ :
एकदा शंकर-पार्वती वरुण-राजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागली. तेव्हा ते भीमानदीच्या काठावर थांबले. तेथे शंकराने त्याच्या त्रिशूळाने पाताळगंगेला वर आणले. ती वर येताच दोघांनी आपली तहान भागवली. त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने त्या प्रवाहाला ‘लोहतीर्थ’ हे नाव दिले. चंद्रभागेच्या जवळच ‘लोहतीर्थ’ आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्रीकृष्णतत्त्व आणि श्रीविष्णुतत्त्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी, म्हणजेच सगुण, तसेच निर्गुण मार्गाने उपासना करणार्यांजसाठी ही मूर्ती लाभदायक आहे. तसेच ब्रह्मगण, शिवगण आणि अनेक शक्तीगण यांनाही अंगाखांद्यावर खेळवणारी ही मूर्ती असल्याने सर्वच स्तरांवरील उपासकांना चैतन्याची फलप्राप्ती करून देणारी आहे; म्हणून सर्वच स्तरांवरील भक्तगण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला भजणारे आहेत.

संत भक्तराज महाराज आणि पांडुरंग

‘एकदा बाबा पंढरपूरला गेले असता आम्ही सगळे मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजे होळकर वाड्यावर बसलो होतो. त्या वेळी पांडुरंगाचे पुजारी (बडवे) तेथे येऊन म्हणाले, ‘‘आज गुरुवार आणि एकादशी असल्याने तुमच्या हस्ते पांडुरंगाला हार आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवावयाचा आहे.’’ तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘बरं, तुमची इच्छा आहे, तर तसे करू !’’ बडवे म्हणाले, ‘‘पांडुरंगाला भेटायची वेळ रात्री १० वाजता आहे.’’

मग बडवे म्हणाले, ‘‘आज फराळ करायला आमच्याकडेच या.’’ त्याप्रमाणे आम्ही बडव्यांकडे फराळाला गेलो. फराळ चालू असतांना बडवे आपल्या मुलाला म्हणाले, ‘‘हार आणि पेढ्याचा पुडा घेऊन ये.’’ तेवढ्यात बाबा म्हणाले, ‘‘कशाला घाई करतोस ?’’ बडवे म्हणाले, ‘‘महाराज, साडेआठ वाजता आमच्या येथे सर्व दुकाने बंद होतात, म्हणून मी घाई करतो आहे.’’ तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘‘त्याने जर १० वाजता भेटीची वेळ दिलेली आहे, त्याला जर आपल्या हातून हार घालून घ्यायचा आहे, तर तो दुकान उघडे ठेवील. नाही मिळाली तर आपण खंत वाटून घ्यायची नाही. नुसते हात जोडायचे.’’ बडव्यांच्या घरून आम्ही पावणेदहा वाजता बाहेर पडलो. त्यांच्या घरासमोरच पांडुरंगाचे मंदिर. पावणेदहा वाजता पेढ्याचे आणि हाराचे दुकान उघडे पाहून पुजारी चकितच झाले. पेढ्याची पुडी आणि हार घेऊन आम्ही सर्व देवळात गेलो.

प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. त्यांच्या बाजूला आम्ही सर्व उभे राहिलो. मग बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला.(तोंडाजवळ नेला़) तेव्हा अर्धा पेढा एकदम गायब झाला. बाबांचा चेहरा लालबुंद झाला.

बाजूचे बडवे बाबांना म्हणाले, ‘‘अहो शेटजी, असा पेढा पांडुरंगाला लावायचा नसतो.’’ बडव्यांनी सर्व हार दूर केले. तरी त्यांना पेढा कोठेही मिळाला नाही. बाबांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श केला, तेव्हा त्यांना उजव्या चरणाजवळ अर्धा पेढा मिळाला. तो पेढा बाबांनी आम्हा भक्तांना दिला. तेथून बाबा तडक होळकरांच्या वाड्यात केव्हा गेले, हे आम्हाला कळले नाही. वाड्यावर गेल्यावर बाबा खांबाला टेकून ठेवलेल्या खुर्चीत बसले. त्यांचा चेहरा लालबुंद दिसत होता. ते कोणाशी बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तरीपण मी जाऊन बाबांना विचारले. तेव्हा त्यांनी हाताने खूण करून ‘भजन करा’, असे सांगितले. आम्ही भजन करायला सुरुवात केली. भजन चालू असतांनाच हुंदके देऊन रडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा पहातो, तर बाबांना गहिवरून आले होते. तेव्हा पवारसाहेब म्हणाले,‘‘आरती करा.’’ त्याप्रमाणे आरती केली. मग बाबा जाऊन झोपले. नंतर बाबांनी आम्हा भक्तांना सांगितले, ‘‘होळकरांकडे आलेले आनंदाश्रू व दुःखाश्रू होते. आनंदाश्रू अशासाठी की, माझ्या गुरुमाऊलीने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडविले व मी पांडुरंगाला पेढा भरविला. दुसरे दुःखाश्रू अशासाठी की, पांडुरंगाने पाषाणातून सगुण रूपात येऊन मला दर्शन दिले. परमेश्वराला पाषाणातून प्रत्यक्ष यायला किती कष्ट पडले असतील, या विचाराने. दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजताच बरोबरच्या सर्वांना घेऊन बाबांनी पंढरपूर सोडले; कारण त्यांना प्रसिद्धी नको होती.’’

पंढपूरची वारी

आषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या एकादशीनिमित्त वारकर्यांतकडून पंढरपूरची वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही कर्मकांडातील साधना आहे. वारीचे वारकरी देहाची पर्वा न करता मैलोन्मैल चालतात. असे केल्याने शारीरिक तप घडते, म्हणजेच हठयोग होतो. मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्तिायोगानुसार केली जाणारी साधना आहे. वारीच्या वेळी केले जाणारे भजन-कीर्तन, नामस्मरण यात भक्तिायोग व नामसंकीर्तनयोग यांचा सहज मिलाप झालेला दिसतो.

विठ्ठल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत

तत्त्व

श्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्तरगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्ताझचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.

`पांडुरंग' या नामाचे वैशिष्ट्य

श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत व पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला, तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला `पांडुरंग' म्हणतात.

श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये

तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नीझ असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी रहाते.

भक्तािच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता

श्री विठ्ठल भक्तााच्या हाकेला लगेच `ओ' देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्त गण `विठूमाऊली' या नावाने संबोधतात. श्री विठ्ठल खूप मायाळू व प्रेमळ अंत:करणाचा असल्याने `तो भक्तांिसाठी धावत येणारच आहे', असा भक्तांुचा ठाम विश्वाेस असतो. त्याच दृढ भावापोटी विठूमाऊलीने भक्तांंची दळणे दळली, गोवर्याा थापल्या व भक्तांची सेवा केली.

मूर्तीविज्ञान

काळया रंगाची, बटबटीत डोळयांची, दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी, अशी विठ्ठलाची मूर्ति असते. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले; कारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता सर्वत्र साक्षिभावाने पहाणारा विठ्ठल त्यात दाखविला आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये ताब्यात असलेला.

विठोबाची आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।
जय देव जय देव ।। धृ० ।।

तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।

- संत नामदेव

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥

Saturday, June 11, 2011

आठवणीतले गाणे .....

माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा
भोगी म्हणुनी उपहसा मी योगी कर्माचा

दैवजात दुःखांनी मनुजा पराधीन केले
त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले
भूषण रामा एक पत्‍नीव्रत मला नको तसले
मोह न मजला किर्तीचा मी नाथ अनाथांचा

रुख्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणु प्रतिमा
किंचीत हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा
तरीही वरितो सहस्त्र सोळा कन्या मी अमला
पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा

कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो
हलाहलाते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो
जगता देण्या संजीवन मी कलंक आदरीतो
वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा

अगा वैकुंठीच्या राया

अगा वैकुंठीच्या राया |
अगा विठ्ठल सखया ||१||

अगा नारायणा |
अगा वासुदेवनंदना ||२||

अगा पुंडलिक वरदा |
अगा विष्णू तू गोविंदा ||३||

अगा रखुमाईच्या कांता |
कान्होपात्रा राखी आता ||४||

[ स्वर - आनंद भाटे / पं. राम मराठे / बालगंधर्व
रचना - संत कान्होपात्रा
राग - भैरवी
ताल - केरवा
नाटक - संत कान्होपात्रा (१९३१) ]

Sunday, May 8, 2011

बालगंधर्व - एक झलक

आठवणीतले गाणे .....

चित्रपट : हा माझा मार्ग एकला (१९६३)
संगीत : बाबूजी
गायक : बाबूजी
गीत : शांता शेळके

हा माझा मार्ग एकला !
शिणलो तरिही चालणे मला

दिसले सुख तो लपले फिरुनी
उरले नशिबी झुरणे दुरुनी
बघता बघता खेळ संपला !

सरले रडणे उरले हसणे
भवती रचितो भलती व्यसने
विझवू बघतो जाळ आतला !

जगतो अजुनी जगणे म्हणुनी
जपतो जखमा हृदयी हसुनी
छळते अजुनी स्वप्न ते मला !

आठवणीतले गाणे .....

चित्रपट : वंदे मातरम ( १९४८ )
संगीत : बाबूजी
गायक : बाबूजी
गीत : गदिमा

वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्

वंद्य वंदे मातरम्

माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती

त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती

आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम्

याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले

शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले

शस्त्रहीना एक लाभे मंत्र वंदे मातरम्

निर्मीला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी

ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी

गा तयांच्या आरतीचे गीत, वंदे मातरम्

Sunday, May 1, 2011

जुने चित्रपट दाखविण्याबाबत ......

जुने चित्रपट दाखविण्याबाबत ......

नमस्कार .

मी एक मराठी श्रोता आहे. आपल्या वाहिनिकडून होणारे सगले कार्यक्रम मी पाहतो. वेगवेगली कथानके वेगवेगल्या रुपात आपन रसिकाना दाखवत आहात त्याबद्दल शतश: आभार !!!
पण सध्या आपल्याकडून शनिवार - रविवार या दिवशी चित्रपट दाखवले जातात. पण त्यामधे पुन:पुन्हा प्रसारित होणारे चित्रपट जास्त आहेत. मराठी चित्रपटसृस्ती " प्रभात "च्या चित्रपटामुले जे अव्याहत सुरु झाली ते आजतागायापर्यंत अशीच सुरु आहे.एक एक कलाकाराने स्वताचा असा काळ गाजविला आहे. त्यामधे राजा गोसावी, राजा परांजपे , गदिमा,पु .ल, नीलू फुले व इतर मान्यवरांचा उलेख करावाच लागेल. पण सध्या जे चित्रपट दाखविले जात आहेत ते पुन्हा पुन्हा दाखविले जात आहेत. त्यापेक्षा जे " जुने " चित्रपट आहेत ते दाखवावेत अशी एक मराठी रसिक म्हणून आपल्याला विनंती आहे. "पेड़गावचे शहाणे ", " माणूस " ," कुंकू "," अमर भूपाळी " ," जगाच्या पाठीवर" व त्या कालातील कित्येक चित्रपटाची फ़क्त नावे ऐकावी लागत आहेत. आजच्या पीडिला जुने चित्रपट पहायला मिलने फार अवघड आहे. अश्यावेली आपल्याकडून ते प्रसारित झाले तर त्याचा फायदा होईल. यातील कित्येक चित्रपट "सीडी"वर उपलब्ध नाहीत त्यामुले ते बाहेरून विकत घेउन पण बघता येत नाही. तुमच्याकडे अश्या चित्रपटाचा साठा असल्याचा अभिमान बाळगून, गम्भिर्याने याची दखल घ्यावी.
आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.

कलावे,
आपला हितचिन्तक ,
प्रणव उंड़े

Friday, April 8, 2011

मटा ट्राफिक .

मटा ट्राफिक .

पादचार्यांना / सायकलस्वाराना शिस्त लावणे गरजेचे.
आज पुणे शहर ज्या प्रमाणात वाढले आहे त्या प्रमाणत आजूबाजूचा विकास होणे गरजेचे आहे. हा विकास फार कमी प्रमाणत होत असल्याचे दिसत आहे. मुख्य प्रश्न जरी रस्ते, वीज,महागाई असली तरी वाहतूक आज सर्वोगामी, मुलभूत प्रश्न बनला आहे.आज पुणे महानगरपालिकेकडून असणार्या ठिकाणी भुयारी रस्ते,वरून चालण्याचे पूल बांधण्यात आले आहेत पण त्यांचा वापर करताना कोणीच दिसून येत नाही.जंगली महाराज रोड, म्हात्रे पूल येथे बांधण्यात आलेल्या भुयारी रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.एसएनडीटी येथे बांधण्यात आलेल्या पुलावरून नागरिक जात नाहीत. आणि मग खूप वेळा ते अपघाताला निमंत्रण देत असतात. यावर एक तोडगा हाच आहे कि जे पादचारी आहेत त्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. आज सायकलस्वार लोक सिग्नलला अजिबात थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे ते विरुद्ध बाजूने जिथे पाहिजे त्या बाजूने चालवतात. त्यांना वाचवण्याच्या नादात कित्येकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. या सायकलस्वाराना पण आरटीओने बंधन घालावे. त्यांच्यवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात यावेत. जोपर्यंत खालच्या स्तरापासून वाहतूक प्रश्न सुधारित नाही तोपर्यंत मूळप्रश्न तसाच राहणार.
आधी मुळात म्हणजे जे दुचाकी चालक अजूनही नियम पाळताना दिसत नाहीत त्यांच्यवर कारवाई होताना दिसत नाही. कायद्याचे राज्य म्हणताना त्याची अंबलबजावणी का बरे होऊ शकत नाही ? दिल्ली वगैरे राज्यांमध्ये जसे " लेन " प्रणाली आहे तशी ती पुण्यात पण होऊ शकते. पण त्यासाठी जी इच्छाशक्ती हवी आहे ती फार कमी आहे. घोटाळे करण्यापेक्षा नगरसेवक, आमदार, खासदार यांनी हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. यासाठी राजकारण न करता एकत्र येऊन " कृती " करावी. चर्चेने प्रश्न सुटत नाहीत. ते वाढले जातात. सध्या पीएमपीएलच्या गाड्या डाव्या बाजूने जाताना दिसतात पण बाकीचे गाड्यावाले म्हणजे रिक्षावाले त्यांना उगाच त्रास देतात. पुण्यात जेवड्या बस नाहीत त्यापेक्षा जास्त रिक्षावाले आहेत.
कित्येकवेळा रिकामे रिक्षावाले उगाच मध्ये उभे राहतात किवा इतके सावकाश चालवितात कि मागे मोठी रांगच लागते. रिक्षा सेनेच्या अध्यक्षांनी त्यांच्या चालकांना पण बसथांब्यावर न थांबण्याचे आदेश द्यावेत. त्यांनी त्यांच्या रीक्षथांब्यावर थांबावे. उपाय खूप आहेत पण नागरिकांनी विरोध न करता सक्रीय सहभाग जर दाखविला तर मेट्रो काय, बीआरटी काय साधी वाहूतक सुधा सुरळीत होईल.

- प्रणव उंडे , सहकारनगर ,पुणे .

एक होता मराठी माणूस

एक होता मराठी माणूस
पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडिलकर-पांडे # फेब्रुवारी-२०१०

फार फार वर्षांपुर्वीची गोष्ट. आट पाट नगर होते. त्या नगरीचे नाव होते मुबई. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी होती. तिनही बाजूनं समुद्रानं कवेत घेतलंल्या या नगरीत पुर्वी कोळी, आगरी, पाचकळशी लोकांचं वास्तव्य असायचं. मुख्यत्वे मराठी नावाचा माणूस इथे रहात होता. ताडा-माडा-झाडांनी वेढलेल्या या नगरीत ती माणसं सुखा-समाधानानं रहात होती. शेती, मासेमारी हे त्यांचे पोटापाण्याचे व्यवसाय. पुढे इंग्रजाच्या काळात मुंबईतला व्यापार-उदीम वाढला. त्यासाठी कामगारांची, दुकानदारांची, छोटया-मोठया व्यावसायीकांची गरज भासायला लागली. त्यासाठी राज्यातील इतर भागातून, देशातल्या इतर राज्यातून माणसं मुंबईत स्थलांतरीत होऊ लागली. स्थाईक व्हायला लागली. कामगारांच्या, कष्टकरांच्या वस्त्या इथे वाढायला लागल्या. आणि मुंबईत माणसांची गर्दीच गर्दी व्हायला लागली.

पुर्वीचा मध्यमवर्गीय मराठी माणूस उभ्या-आडव्या चाळीत रहायचा. आपण आपली नोकरी करावी. सांभाळावी. रोज संध्याकाळी टीव्हीसमोर बसावे, रविवारी दुपारी जेवणावर मनसोक्त ताव मारावा आणि संध्याकाळी दादर नाहीतर गिरगाव चौपाटीवर बायको मुलांबरोबर फिरायला न्यावे. सणाला काहीतरी गोडधोड करावे, दिवाळीला फराळ, कुटंबातल्या प्रत्येकाला नवीन कपडे करावे, उत्साही लोकांनी शैक्षणिक, सामाजीक, सांस्कृतीक मंडळे चालवावीत, पोरांनी सुट्टीच्या दिवसात रस्त्यात मैदान मांडावे. वयोवृध्दानी राजकारण्यांना, राजकारणाला, श्रीमंताना बिनधास्त शिव्या द्याव्यात, बाया-बापडयांनी घर सांभाळावे, लहानांपासुन थोरांपर्यंत सर्वानी छोटया-मोठया उत्सवात कायम मग्न असावे, हे त्याच्या आवडीचे छंद.

महाराष्ट्र दिवस आणि ड्राय डे

स्वातंत्र्यानंतर देशभर भाषीक राज्याच्या रचनेस केंद्राची मान्यता होती. मुंबईत मराठी भाषिकांची संख्या जास्त असतांनाही आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असतांनाही ती महाराष्ट्राला द्यावी की न द्यावी या संभ्रमात दिल्लीतले नेते होते. त्या कटात महाराष्ट्रातल्या राजकारणारले काही पुढारीही सामिल होते. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून मुंबईला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा असे त्यांना वाटत होते. पण लेखक-पत्रकार-कलावंत-विचारवंत आणि सर्वसामान्य माणसानी सरकारविरुध्द लढा देऊन मुंबई महाराष्ट्रात राखली. त्यात १०६ माणसांना आपले जीव गमवावे लागले. १ मे १९६० हा दिवस त्यामुळेच महाराष्ट्र दिवस आणि ड्राय डे म्हणूनही पाळला जातो.

परप्रांतीय नावाची भीती

पोटापाण्यासाठी परप्रांतातून मुंबईत आलेल्या दक्षीण भारतीय, उत्तरप्रदेशी, बिहारी, गुजराती, पंजाबी, मारवाडी यांनी पुढे पुढे मुंबईत आपले बस्तान बांधायला सुरुवात केली. हे लोक प्रामुख्याने व्यवसाय धंदा करायच्या हेतूनेच मुंबईत आले होते. सकाळच्या चहापासून रात्री झोपायच्या चादरींपर्यत प्रत्येक गोष्टींचा या माणसानी धंदा केला. मुंबईतून अमाप पैसा कमावला. मुंबईत आपली गडगंज संप्पती मिळवली, त्याच्या जोरावर सत्तेशी जवळीक साधली. काहीनी सत्ताही मिळवली. आणि आपल्याला हवे ते सुख प्राप्त करुन घेतले.

गिरणीच्या संपानंतर मुंबईत कोकणातला, देशावरचा गरीब मराठी माणूस देशोधडीला लागला. पोटापाण्यासाठी मिळेल ती नोकरी त्याने पत्करली पण वाढत चाललेल्या महागाईने तो खंगत चालला. आपल्या कुटूंबाची देखभाल करायची की आपल्या स्वप्नांची पुर्ती करायची या कैचीत तो कातरला गेला. गावाकडे निघून जावे तर गावाकडची जमीन विकलेली. ज्याची आहे त्याची कसायची सवयही गेलेली. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहिर अशी त्याची अवस्था झाली होती. नोकरी नाही म्हणून मुलांना चांगले शिक्षण नाही. चांगले शिक्षण नाही म्हणून पुन्हा त्यांना चांगली नोकरी नाही अश्या दुष्टचक्रात तो अडकून गेला. व्यवसाय करायचा तर पैसा नाही आणि रस्त्यावर धंदा करायचीही त्याला लाज वाटायची.

उत्तर भारतातून आलेल्या भय्या नावाच्या माणसाला तो खुप घाबरत असे. कारण तो माणूस कसाही, कुठेही, कोणत्याही परस्थीतीत तग धरुन रहायचा. त्याने आपली रोजी-रोटी छिनून घेतली असे मराठी माणसाला वाटायचे. तो अर्ध्या पगारात काम करतो. तो वाटेल तो धंदा करतो याचा त्याला राग यायचा. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची असे म्हणता म्हणता मुंबईत मराठी माणसांची संख्या शंभरात पंचवीसच्या खाली आणि भय्यांची शंभरात पन्नासच्या वर कधी गेली हे त्याला समजलंच नाही. मुंबईत अनधिकृत झोपडया वाढल्या. त्याही झोपडया पुढे अधिकृत झाल्या. मुंबईत त्या भय्यांचे इलाखे तयार झाले. पुढे पुढे ते इथले मतदार म्हणूनच हक्कदारही झाले. त्यातलेच काही नगरसेवक आणि आमदारही झाले. भविष्यात कदाचीत त्यातलाच एक महाराष्ट्राचा मुख्यामंत्रीही बनू शकतो. जादू घडावी अश्या गोष्टी त्याच्या नजरेसमोरच घडत होत्या.

चलो मुंबई(बाहेर)

पुढे पुढे मराठी माणूस विरार, बदलापूर, नवी मुंबईच्या पुढे आपला संसार थाटू लागला. तो प्रदुषणाचे, गर्दीचे कारण पुढे करी पण आपली मुंबईत रहायची लायकी नाही हे त्याला कळून चुकले होते. मराठी माणसाला आपल्या मृत्युची चाहुल लागेपर्यंत खुप उशीर झाला होता. पुर्वीपासूनच मरीन लाइन्स, मलबार हिल, पाली हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, जुहु, याकडे मराठी माणूस किंवा त्याच्या, बायका लेकी, सुना फक्त तिथे राहणार्‍या गुजराती, मारवाडी शेठ लोकांची भांडी घासायला जायच्या, तिथे राहण्याचं स्वप्न त्यानं स्वप्नातही पहीलं नाही. पण पुढे मुंबईतल्या कोणत्याही भागात उभ्या राहणार्‍या गगनचुंबी इमारतीत मराठी आडनावाचा माणूस औषधालाही सापडेनासा झाला. पण तेंव्हा खूप उशीर झालेला होता.

शेवटी शेवटी मराठी माणूस साध्या साध्या गोष्टींवरुन चिडायचा. संप करायचा. कुणाच्याही मुस्कटात मारायचा, शिव्या द्यायचा, दगडफेक, जाळपोळ करायचा. त्याचा स्वभाव चिडचिडा झाला. आपण फक्त घोषणेपुरताच उरलो आहोत अशी त्याची भावना झाली. तरीही मराठी मराठी म्हणून कुणी त्याला गोंजारलं तर त्याचा उर भरुन यायचा. मराठीच्या, मुंबईच्या अभिमानानं त्याची छाती भरुन यायची. काहीतरी केलं पाहीजे असं त्याला वाटायचं. पण पुन्हा सकाळ संध्याकाळच्या रेल्वेच्या गर्दीत आणि राईच्या तेलाच्या वासात त्याचा अभिमान बुजून जायचा.

असा होता मराठी माणूस. मनानं सात्विक, निर्मळ आणि भावनीकही होता. शेवटपर्यंत 'मुंबई माझी', 'मुंबई माझी' असा आक्रोश उर फुटेस्तोवर करीत राहीला. खाण्यापासून, सणांपर्यंत त्याच्या काही परंपरा होत्या. त्याची म्हणून एक संस्कृती होती. त्याचा म्हणून काही इतिहास होता, पण त्याची एक साधी खूणही आता मुंबईत सापडत नाही. शेवटी मेहनत आणि कष्ट केले नाहीत म्हणून मराठी माणसाचा झिजून झिजून मृत्यू झाला. त्याच्या आत्म्यास शांती लाभो

Thursday, March 24, 2011

एक गाणे

नमस्कार. मी नुकतेच पुण्यातील आकाशवाणीकडून " दत्त दत्त म्हणता नित्य " हे गाणे पौर्णिमा कुलकर्णी यांच्या स्वरातून ऐकले. मी त्याची चौकशी केली पण आकाशवाणीने नकार दिला. मला हे गाणे ऐकयाचे होते. ही रचना संत एकनाथ यांनी केली आहे. त्यांच्या असंख्य अभंगापैकी हा एक आहे. तो उपलब्ध झाला तर फार बरे होईल. त्याला संगीत्त दीपक पाटेकर यांनी दिले आहे.