Tuesday, December 20, 2011

महाशिवरात्री

माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी सर्व शिवभक्‍त शंकराची, म्हणजे शिवाची पूजा करतात. या निमित्ताने आपण शिवाविषयी काही माहिती करून घेऊया. आपल्या संस्कृतीत विविध देवता, त्यांच्या उपासना सांगितल्या आहेत. हवेत ऑक्सिजन, नायट्रोजन इत्यादि मूलभूत तत्त्वे आहेत, तसेच ३३ कोटी देवता या तत्त्व रूपाने आहेत. त्यांतील प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. प्रत्येक देवतेची उपासना करून आपल्याला त्या त्या देवतेशी एकरूप होता येते. महाशिवरात्रीदिवशी शिवाचे तत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात येत असते. त्यामुळे त्या दिवशी शिवाची उपासना केल्यास त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो.

`महाशिवरात्री' म्हणजे काय ?
पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.

महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?
शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्‍वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्‍वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्‍तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे.

शिवपूजेची वैशिष्ट्ये

१. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.
३. शिवपूजेत पांढर्‍या अक्षता वापरतात.
४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.
५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

शिव या शब्दाची उत्पत्ती

'शिव' या शब्दाविषयी काही माहिती करून घेऊया. 'शिव' हा शब्द `वश' या शब्दापासून अक्षरांच्या उलटापालटीने तयार झाला आहे. वश् म्हणजे प्रकाशणे. म्हणून जो प्रकाशतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाशी आहे. तो स्वत: प्रकाशित राहून विश्‍वालाही प्रकाशित करतो. शिव म्हणजे मंगलमय व कल्याणस्वरूप असे तत्त्व. शिव हा सत्त्व, रज व तम या तिघांना (त्रिगुणातीत करणारा) म्हणजेच अज्ञानाला एकत्रितपणे नष्ट करतो.

शिवाची इतर नावे

शंकर : शं करोती इति शंकर: । शं म्हणजे कल्याण व करोती म्हणजे करतो. जो कल्याण करतो, तो शंकर होय.

महाकालेश्वर : अखिल विश्वब्रह्मांडाचा अधिष्ठाता देव (क्षेत्रपालदेव) हा काळपुरुष म्हणजेच महाकाळ आहे. म्हणून याला महाकालेश्वर म्हणतात.

महादेव : परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण ज्ञान व परिपूर्ण साधना हे तीनही ज्याच्यात एकत्र आहेत, अशा देवास देवांचा देव म्हणजेच महादेव म्हणतात.

भालचंद्र : भाली म्हणजे कपाळी ज्याने चंद्र धारण केला आहे तो भालचंद्र. शिवपुत्र गणपतीचेही भालचंद्र हे एक नांव आहे.

कर्पूरगौर : शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे, म्हणून त्याला कर्पूरगौर असेही म्हणतात.

शिवाची काही वैशिष्ट्ये

शिवाची काही वैशिष्ट्ये

नाग

शिवाच्या अंगावर ९ नाग असतात. शंकराच्या डोक्यावर एक, गळयात एक, दोन दंडात प्रत्येकी एक दोन, मनगटात प्रत्येकी एक, कमरेत एक व दोन मांड्यात प्रत्येकी एक अशा नऊ ठिकाणी हे ९ नाग असतात.
गंगा

शिवाच्या डोक्यातून गंगा वहाते. गंगा म्हणजे ज्याच्यापासून गमन करतात असा ओघ. म्हणजे गं ग- गंगा यालाच शिवाच्या डोक्यावरून गंगा अवतरली असे म्हणतात. पृथ्वीवरील गंगा नदीत या आध्यात्मिक गंगेचे अंशात्मक तत्त्व असल्याने प्रदुषणाने ती कितीही अशुद्ध झाली, तरी तिचे पावित्र्य कायम टिकते, म्हणूनच विश्‍वातील कोणत्याही जलाशी तुलना केली, तर गंगाजल सर्वांत पवित्र आहे, असे जाणवते.

त्रिनेत्र

शंकर त्रिनेत्र आहे. शिवाचा डावा डोळा म्हणजे पहिला, उजवा डोळा म्हणजे दुसरा दुसरा डोळा व भ्रूमध्याच्या जरा वर सूक्ष्म-रूपात असलेला ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा होय. यामुळेच शंकर भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्य काळ या त्रिकालातील घटना पाहू शकतो.

चंद्र

शिवाच्या कपाळी अर्धचंद्र असतो. मानवरूपातील शिवाच्या हातात पुढील चार आभूषणे असून ती प्रतिकात्मक आहेत. १ डमरू २. त्रिशूळ ३. पाष किंवा मृग ४ परशु.

तांडवनृत्य

शिवाच्या दोन अवस्था मानल्या आहेत. त्यांतील एक समाधि अवस्था व दुसरी तांडव किंवा लास्य नृत्य अवस्था. लास्य नृत्यामध्ये हात मोकळे असतात व वेगवेगळया मुद्रा केल्या जातात. तंडून करून दाखवले ते तांडव, असे जाणून भरतादि मुनींनी ते नृत्य मानवांना शिकवले.

नंदी

नंदी म्हणजेच आनंदी. वृषभरूपातील नंदी हे शिवाचे वाहन आहे. त्याला शिव परिवारात महत्त्वाचे स्थान आहे. शिवाचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घेतले जाते.

Monday, December 19, 2011

श्री दत्तात्रयांच्या आरत्यांचा संग्रह

आरती दत्तात्रयप्रभूची ।
करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥



आरती दत्तात्रयप्रभूची ।
करावी सद्‌भावें त्याची ॥ धृ. ॥

श्रीपदकमला लाजविती ।
वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥
कटिस्थित कौपिन ती वरती ।
छोटी अरुणोदय वरि ती ॥ चाल ॥
वर्णूं काय तिची लीला ।
हीच प्रसवली, मिष्टान्न बहु, तुष्टचि झाले,
ब्रह्मक्षेत्र आणि वैष्य शुद्रही सेवुनियां जीची ॥
अभिरूची सेवुनियां ॥ १ ॥

गुरुवर सुंदर जगजेठी ।
ज्याचें ब्रह्मांडे पोटीं ।
माळा सुविलंबित कंठी ।
बिंबफळ रम्य वर्णूं ओष्ठी ॥ चाल ॥
अहा ती कुंदरदनशोभा ।
दंडकमंडलू, शंखचक्र करिं, गदापद्म धरि,
जटामुकुट परि, शोभतसे ज्याची ॥
मनोहर शोभतसे. ॥ २ ॥

रुचिरा सौम्य युग्मह्रष्टी ।
जिनें द्विज तारियला कुष्टी ॥
दरिद्रे ब्राह्मण बहु कष्टी ।
केला तिनेंच संतुष्टी ॥ चाल. ॥
दयाळा किती म्हणूनि वर्णू ।
वंध्या वृंदा, तिची सुश्रद्धा, पाडुनि बिबुधची,
पुत्ररत्न जिस देउनिया सतिची ॥
इच्छा पुरविली मनिंची ॥ ३ ॥

देवा अघटित तव लीला ॥
रजकही चक्रवर्ती केला ॥
दावुन विश्वरुप मुनिला ।
द्विजादरशूल पळें हरिंला ॥ चाल. ॥
दुभविला वांझ महिषी एक ।
निमिषामाजी, श्रीशैल्याला तंतुक नेला,
पतिताकरवी, वेद वदविला, महिमा अशी ज्याची ॥
स्मराही महिमा. ॥ ४ ॥

ओळखुनि क्षुद्रभाव चित्ती ।
दिधलें पीक अमित शेती ॥
भूसर एक शुष्क वृत्ती ॥
क्षणार्धे धनद तया करिती ॥ चाल. ॥
ज्याची अतुल असे करणी ।
नयन झांकुनी, सर्वे उघडितां नेला काशिस,
भक्त पाहातां वार्ता अशि ज्याची ॥
स्मरा हो वार्ता अशि ज्याची ॥ ५ ॥

दयाकुल औदुंबरि मुर्ती ।
नमितां होय शांतवृत्ती ॥
न देती जननमरण पुढती ।
सत्य हे न धर मनि भ्रांति ॥ चाल ॥
सनातन सर्वसाक्षी ऎसा ।
दुस्तर हा भव, निस्तरावया, जाउनि स्त्वर,
आम्ही सविस्तर, पूजा करुं त्याची ॥
चला हो पूजा करुं त्याची ॥ ६ ॥

तल्लिन होउनि गुरुचरणीं ।
जोडुनि भक्तराजपाणी ॥
मागे हेंचि जनकजननी ।
अंती ठाव देऊ चरणीं ॥ चाल. ॥
नको मज दुजे आणिक कांही ।
भक्तवत्सला, दीनदयाळा, परम कृपाळा, दास नित्य याची ॥
उपेक्षा करूं नको साची ॥ ७ ॥

Sunday, December 18, 2011

दत्त जयंती


दत्त जयंती

एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्‍ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्‍न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्त जयंती' म्हणून साजरा करतात.



दत्त जयंतीचे महत्त्व

दत्त जयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.



जन्मोत्सव साजरा करणे

दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्‍त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच 'गुरुचरित्रसप्‍ताह' असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप आणि आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख अन चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ अन डमरू शंकराचे प्रतीक आहे.



महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे. काही ब्राह्मण कुटुंबांत या उत्सवानिमित्त दत्तनवरात्र पाळले जाते आणि त्याचा प्रारंभ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून होतो.



`श्री गुरुदेव दत्त ' या नामजपाचे महत्त्व

पूर्वजांचा त्रास असल्यास दैनंदिन जीवनात उद्‌भवणार्‍या समस्यांची काही उदाहरणे खाली दिली आहेत, उदा. परीक्षेच्या वेळी आजारी पडणे, प्रामाणिकपणे अभ्यास करूनही अपेक्षित यश न मिळणे, नोकरी न मिळणे, घरात भांडण-तंटे, लग्न न होणे, लग्न झाल्यास पती-पत्‍नीचे न पटणे, पटल्यास स्वत:मध्ये कोणतेही शारीरिक व्यंग नसतांना मूल न होणे, मूल झाल्यास मतिमंद किंवा विकलांग होणे, अपमृत्यू, धंदा न चालणे, दारिद्र्य, शारीरिक आजार अशा समस्या उद्‌भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतिदिन 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप न्यूनतम (किमान) १०८ वेळा लिहावा. तसेच मोठ्यांना हा त्रास असल्यास रोज किमान १ घंटा तरी `श्री गुरुदेव दत्त' हा नामजप करावा. त्रासाच्या तीव्रतेनुसार हा नामजपाचा कालावधी वाढवावा.



दत्त अवतार - दत्ताच्या परिवाराचा भावार्थ

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्‍वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले व पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्‍वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले.



`श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार व `श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार होय. तसेच `माणिकप्रभु' तिसरे व `श्री स्वामी समर्थ महाराज' हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे `नेमिनाथ' म्हणून पहातात आणि मुसलमान `फकिराच्या वेशात' पहातात. दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत.



दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका व औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. दत्त हा `गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. `श्री गुरुदेव दत्त', `श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात. `दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे.



दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे - झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात व तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.

Sunday, December 4, 2011

पु. ल . यांचे सावरकांवरील भाषण

गेल्या शतकातील एक सत्यकथा



१५ ऑगस्ट१९८२ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही फिल्म्स डिव्हिजनचे काही कर्मचारी ध्वजवन्दनाकरिता फिल्म भवनात जमलो होतो. कार्यक्रम संपन्न होताच, दिल्लीला गेलेले आमचे एक सहकारी, श्री. प्रभाकर पेंढारकर तितक्यात तेथे उपस्थित झाले आणि त्यांनी माहिती आणि मंत्री श्री. वसंत साठे यांचा तातडीचा एक संदेश थापांना दिला – “सावरकर अनुबोधपटाचे चित्रीकरण लवकर सुरु करावे”. थापांनी ते पत्र वाचून माझ्यापुढे करत म्हणाले “गेट बिझी इमिजिएटली.”



१९७७ साली प्रारंभ झालेल्या या अनुबोधपटाचे कार्य १९८० साली गुंडाळण्यात आले होते आणि एकदम १९८२ मध्ये त्याला एकाएकी पुनश्च्य सुवर्णमुहूर्त लाभला होता. कुठेतरी वाचल्याचे आठवते, 'एखाद्या व्यक्तीचे तेजोमय भविष्य त्याच्या मृत्यूनंतरही ओसंडून वाहत जाते आणि मनाला विलक्षण आनंदाचा आभास देते.' अशा या उत्कंठित पार्श्वभूमीवर सावरकर अनुबोधपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झपाट्याने

झाली. प्रथम स्वातंत्र्यवीरांचे जन्मगाव भगूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, शिरगाव या क्रमाने चित्रीकरण करत आम्ही फेब्रुवारी १९८३ च्या दुस-या आठवड्यात अंदमानला पोचलो.



प्रथमपासूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल माझ्या मनात आदर असल्यामुळे, अंदमानात स्थायिक झालेले सावरकरभक्त, सेवानिवृत्त जेलर श्री. गोविंदराव हर्षे यांच्या सहकार्याने अंदमानचे कुविख्यात कारागृह आणि तेथील सावरकरांच्या कोठडीच्या चित्रीकरणाचे कार्य जोरात सुरु झाले. शनिवार दि. २६ फेब्रुवारी १९८३ च्या सकाळी शूटिंग चालू असतांना हर्षे म्हणाले, "आज सावरकरांची पुण्यतिथी. योगायोगाने विख्यात साहित्यिक श्री. पु. ल. देशपांडे यांचे वास्तव्य इथे आहे. मी त्यांना आज सायंकाळी इथे आमंत्रित केले आहे. अंदमान महाराष्ट्र मंडळाचे सर्व सदस्य आणि इथल्या नौदलामध्ये काम करणारे सर्व महाराष्ट्रीयन लोक इथे येणार आहेत. त्यामुळे आपण आपले शूटिंग दुपारनंतर बंद करुया. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाच्या दिवशी पु. लं.ची अंदमानच्या कारागृहात उपस्थिती म्हणजे आम्हा सगळ्यांना तो अति विलक्षण अनुभवाचा आणि आनंदाचा दिवस.



सायंकाळी कारागृहाच्या मुख्यद्वारी, अंदमान द्विपातल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी पु. लं.चे स्वागत केले. ७२ वर्षांपूर्वी १९११ मध्ये स्वा. सावरकरांना बंदी रुपात या तुरुंगात ज्या वाटेने घेऊन जाण्यात आले असेल, कदाचित त्याच पायवाटेने आज पु. ल. जात होते. कारागृहाच्या तिस-या मजल्यावरचे मोठे लोखंडी दर अति भयाण आवाज करीत उघडण्यात आले.समोर दोन भिंतींच्या मधोमध असलेला एक लांब पॅसेज थेट स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीपर्यंत जात होता. तो डोळ्यापुढे येताच पु. ल. गहिवरून गेले.भावनेने ओथंबून जाऊन ते उदगारले "तात्यांना इथे ठेवले होते?" त्यांचा गळा भरून आला होता. पुढे त्यांना काही बोलताच येईना.



सतत हसतमुख असणा-या आणि इतरांना हसवणा-या पु. लं.चे हे असामान्य रूप आम्ही पाहत होतो. हळहळत पुढे जात, पु. ल. त्या लोखंडी दारांच्या आंत, 'सावरकर कोठडीत शिरले. आमची गर्दी त्यांच्यामागेच, त्या १३ X ७ फुटांच्या कोठडीसमोरच होती. आमच्यांतल्या काहींनाच आत शिरता आले. तिथे त्या काळोखांत, भिंतीवर असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या तैलचित्राला पु. लं.नी पुष्पहार अर्पण केला आणि नतमस्तक होऊन आदराने नमस्कार केला. पुढे काही क्षण ते तसेच स्तब्ध होते. अशा या हृदयस्पर्शी वातावरणाला तेजोमय करण्यासाठी आमच्या गर्दीतल्या एकाने मोठयाने आरोळी ठोकली "वंदे मातरम"..."भारतमाताकी जय"..." स्वातंत्र्यवीर सावरकरकी जय".... आणि आम्ही सर्वांनी त्याला दुजोरा दिला.अशा आमच्या या घोषणांचा प्रतिध्वनी संपूर्ण कारागृहाच्या आवारांत घुमला. बहुतेक त्या कारागृहाच्या आयुष्यात प्रथमच अशा मुक्त, हौशी घोषणांचा दिलखुलास वर्षाव झाला असेल. पु. ल. भारावून गेले.सावरकर कोठडीच्या समोर, खाली अंगणात, जिथे ब्रिटीशांच्या काळांत कैद्याना फटके मारले जात, तिथेच पु. लं.चे भावनेने ओथंबलेले, स्फुर्तीदायक, स्वातंत्र्यवीरांच्या आदरांजलीला साजेल असे अविस्मरणीय साजेल असे अविस्मरणीय भाषण झाले.



ते भाषण जसेच्या तसे इथे देत आहोत -



मित्रहो,आजचा दिवस हा मी माझ्या आयुष्यातला परम भाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नसल्यामुळे मी त्याला पूर्वजन्माचा आधार देत नाही. पण माझ्या हातून कधीतरी काहीतरी असं घडलेलं असलं पाहिजे, की ज्यामुळे अशा प्रकारचा भाग्ययोग मला लाभला आहे. सावरकरांच्या प्रतिमेला आत्ताच आपण पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख नेहमी 'अंदमानातली कोठडी' असा केला जातो. परंतु ज्या वेळेला एखाद्या खोलीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येतं, त्यावेळेला त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आत्ता जिथे गेलो तो असाच एक गाभारा झालेला आहे. तिथे एक मूर्तिमंत तेज वावरत होतं. 'तेजस्विना वधी तमस्तु' असं आपण नुसतं म्हणत असतो. म्हंटलेलंही विसरून जात असतो. रोज म्हणत असतो.पण ख-या अर्थानं ज्यांची काय, वाचा, मन सगळंच तेजस्वी, ओजस्वी होतं अशी भारतीय इतिहासातील व्यक्ती शोधायची झाली तर प्रथम आपल्याला आधुनिक काळामध्ये वीर सावरकरांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. प्रत्येक क्षण हा जीवन उजळण्यासाठी आहे हे दाखवून देणारं त्याचं उभं आयुष्य होतं. ते अंधाराचे सर्वात मोठे शत्रू होते. मग तो अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा पारतन्त्र्यासारख्या गोष्टींनी आपल्यावर लादलेला असो. अंधाराविरुद्ध त्यांनी सदैव झुंज मांडलेली होती.



मनुष्यजीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तींशी सतत झुंज घ्यावी लागत असते. एक मनुष्य आणि निसर्ग, दुसरी मनुष्य आणि मनुष्य, अंतत: तिसरी झुंज म्हणजे त्याची स्वत:शीच, स्वत:च्या आत्म्याशीच चालू असलेली झुंज. प्रत्येकाच्या अंतर्गतच एक युद्ध चाललेलं असतं. त्याच अर्थानं तुकारामांनी म्हटलंय, 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'. कुठलंही युद्ध म्हटलं की त्याचा पाहिला नियम असा आहे की युद्ध खेळणं-यानं 'मी जिंकणारच' याच भावनेनं त्याच्यात जावं लागतं.



सावरकरांनीसुद्धा 'मारिता मारिता मरावे' याचाच पुनःपुन्हा उद्घोष केलेला होता. पराजयाच्या भूमिकेतून गेलेला मनुष्य कधी युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या विचारांचं सर काढायचं झालं तर असं दिसेल की केवळ राजकीय गोष्टींवरच हल्ला करा असं त्यांनी सांगितलं असं नाही, तर जिथे जिथे तुम्हाला अज्ञान दिसेल तिथे तिथे एखाद्या वीर पुरुषासारखे तुटून पडा असं त्यांनी सांगितलं. म्हणून वैचारिक दृष्टीने आधुनिक काळातल्या विज्ञानमहर्षींच्यामध्ये सावरकरांचं नाव आपण अतिशय आदराने घेतलं पाहिजे. विज्ञाननिष्ठा या विषयावरचे त्यांचे निबंध आपण वाचा, आणि 'विज्ञाननिष्ठा' का तर विज्ञान हे सतत अंधारावर मत करायला जात असतं म्हणून.



सर्व ठिकाणचा काळोख प्रकाशमान करण्याची गरज असते. काळोख याचा अर्थ भय, काळोख याचा अर्थ अंधश्रद्धा, काळोख याचा अर्थ आंधळेपण.सर्व ठिकाणचं अशा प्रकारचं यासाठी त्यांनी नुसती लेखणीच नाही, नुसती वणीच नाही, तर सगळं शरीरकाया त्यासाठी झिजवली. २६ फेब्रुवारी हा त्यांच्या "आत्मार्पणाचा" दिवस आहे असं आपण म्हणतो. त्यांच्याच शब्दात म्हणायचं तर 'जीवाना ध्वरि पडे आज पूर्णाहुती' असा आपला हिशोबाच्या दृष्टीनं आज त्यांच्या आत्मार्पणाचा दिवस असेलही. परंतू त्यांच्या वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून प्रत्येकच दिवस हा त्यांच्यासाठी आत्मार्पणाचाच दिवस होता. "आत्मार्पण' हा विचार त्यांच्या मनात आला नाही असा एकही दिवस नसेल. आपण मात्र पुष्कळसे लोक केवळ मरता येत नाही म्हणून जगात असतो.



आपल्या जगण्याला तसा श्वासोच्छवास घेणं यापलिकडे फारसा अर्थ नसतो. पण जिथे जिथे लोकांना गुदमारलेपणा जाणवतो, जिथे जिथे लोकांना मोकळे श्वास घेता येत नाहीत, त्या सर्वांचे श्वास मोकळे करण्यासाठी मला श्वासोच्छवास घ्यायचाय या भूमिकेतून जेव्हा माणूस जगतो तेव्हा तो ख-या अर्थाने पारमार्थिक असतो. टिळे, माळा लावून 'जय जय रामकृष्ण हरी' म्हणणारा पारमार्थिक आहे असं उगीचच आपण समाजात असतो. पण जीवनाचा परम-अर्थ कळावा याच्यासाठी झगडणारा मनुष्य, निसर्ग-माणूस आणि आपण स्वत:, ही सर्व कोडी उलगडण्याच्या मागे लागणारा मनुष्य हा पारमार्थिक म्हटला पाहिजे.



सावरकरांना या सेल्युलर जेलमध्ये प्रचंड शक्ती मिळाली. आज जरी आपण तिथे नुसते जाऊन आलो तरी भयाण वाटतं. आपण कल्पना करू शकता की त्या काळी ते असेच इथे उभे राहिले असतील. हे दृश्य पाहिल्यावर आपल्याला इथे ५० वर्षं काढायचीत याखेरीज दुसरा विचार कदाचित त्यांच्यासमोर नसेल. ब्रिटीश सत्तेला विरोध करणा-यांना, माणसासारख्या माणसांना मारणं हे ज्यांना लहान मुलांच्या खेळासारखं वाटत होतं अशांच्यात एव्हढी वर्षं त्यांना काढायची होती. तरीही मनात विश्वास बाळगायचा की या सगळ्या शृंखला गळून पडण्याचा एक दिवस येणार आहे. मित्रानो, त्यांनी त्या वेळेला सांगून ठेवलं होतं की एक दिवस येथे आमचे पुतळे उभे राहतील. हा काही अंधविश्वास नव्हता. त्यांना खात्रीच होती की ही परिस्थिती आम्ही बदलू शकतो. हा विश्वास येण्यासाठी त्यांनी विज्ञान दृष्टीनं जगाकडे पाहिलं होतं.



ज्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आम्ही अमृताचे पुत्र आहोत. एक दिवस मरण्यासाठीच जन्माला आलेले आहात असं सांगणारा नव्हे, तर 'अमृताचे पुत्र' आहात असं सांगणारा हिंदू धर्मच त्यांच्या डोळ्यापुढे असतो. घंटा वाजाव्यात तसे त्यांच्या मनाच्या गाभा-यामध्ये हेच विचार वाजत होते. त्यांना एक माहीत होतं की दुबळ्यांच्या वाटेला दैव कधीही येत नाही. प्रत्येक बाबतीतल्या दुबळेपणाचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. सामोपचारानं आणि काहीतरी थातूरमातूर करून राजकारण करणा-या मंडळींच्या बाबत त्यांनी 'महाबळ भट्टी' प्रयोग नको, अस एक शब्दप्रयोग केलेला आहे. आतलं शास्त्र काही कळलेलं नसताना जी नुसती पोपटपंचीच असते असा 'महाबळ भट्टी' प्रयोग नको, असं ते म्हणतात. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर पारखून जेव्हा एखादा माणूस घेत असतो तेव्हा त्याच्या दृष्टीने पराजय नसतोच.



मर्ढेकरांनीही आपल्या कवितेत म्हटलंय की 'भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी.' नुसतंच एखादी गोष्ट पाहून भावनाबंबाळ होण्याला काही अर्थ नाही. समजा हा सेल्युलर जेल पाहून मी डोळ्यात अश्रू आणून थयथया नाचायला लागलो आणि मला किती दु:ख झालंय हे सामान्यत: दोनशे माणसांना कळवणं म्हणजेच भावना असते असं नव्हे. उत्कृष्ट भावना तीच असते की, जिला आवर घालून त्यापुढचं कार्य करण्यासाठी बुद्धीची शक्ती मिळते. शास्त्रकाट्याची अशी कसोटी बुद्धीला लावणारे सावरकर होते.



अंदमान हे एका दृष्टीने तीर्थस्थानच झालेलं आहे. हे निराळ्या अर्थाचं तीर्थस्थान आहे.सावरकरांच्या इतकी विज्ञाननिष्ठा असलेले लेख फार कमी आपल्याला वाचायला मिळतात. खरं दुर्दैव हे आहे की आपण वाचतच नाही. मी आता काही तुमची परीक्षा घेणार नाही. पण इथे आलेल्यांना जर आपण विचारलं की तुम्ही कितीसे सावरकर वाचलेत, तर वाचलेत म्हणणारी फार थोडी मंडळी असतील. इथे याच जागी बसून, तुमच्यातच येऊन तुम्हाला नावं ठेवणं हे मला बरं वाटत नसलं, तरी एकेकाळी मी मास्तर असल्यामुळे असे लोक जमलेले दिसले की तशी खुमखुमी येते त्याला काय करणार! पण, सावरकर जितके तपशीलात, पुन्हा पुन्हा वाचत जाऊ, तसं आपल्याला दिसतं की या माणसानं एखाद्या ज्योतिषासारखी भविष्यं केलेली आहेत. आणि ज्योतिष्यासारखी, म्हणजे केवळ थातूरमातूर ज्योतिषासारखी नव्हे तर त्याचं गणित

मांडून केलेली भविष्यं आहेत. ५० वर्षांच्या शिक्षेसाठी आत जाणारा माणूस कशाच्या आधारावर म्हणत होता की, एक दिवस इथे आमचे पुतळे उभे राहतील?



त्यांना कळत होतं की माणसानं एकदा जिद्दीनं ठरवल्यानंतर कुणीही त्याच्या आड येऊ शकत नाही. ते त्यांचं म्हणणं खरं झालं.आत्ताच श्री हर्षे यांनी मला विनंती केली होती की सावरकरांच्याबद्दल व्यक्तिगत काहीतरी तुम्ही बोला. तुम्हाला खरं सांगतो, त्यांच्याजवळ जाण्याची

हिंमत सुद्धा मला कधी झाली नव्हती. सुर्याचं तेज नेहमी दुरूनच घ्यायचं असतं. त्याच्या फार जवळ गेलं तर आपण भस्मसात होऊन जाऊ. आम्ही सावरकरांना भेटत आलो ते त्यांच्या पुस्तकांतून, त्यांच्या ग्रंथांतून. पण माझ्या आयुष्यांत आणखी एक सुवर्णयोग आला होता. त्यांचा अमृतमहोत्सव झाला तेव्हा मी सावरकरांचं भाषण ऐकलं होतं. आमच्या लहानपणी पार्ल्याला सावरकर बरेच वेळा येऊन गेले, तेव्हाही त्यांची भाषणं ऐकली होती. 'गंगेसारखा ओघ' ही उपमा वक्तृत्वाला का देतात ते सावरकरांचं भाषण ऐकल्यावर कळतं.



सावरकरांनी किती त-हांची श्रीमंती आपल्याला दिली आहे! भाषेवरून मला आठवतंय, सावरकरांनी रूढ केलेले कितीतरी शब्द आपण वापरत असतो, ते आपल्याला माहीतही नसतं. सुरुवातीला जेव्हा ते आले, तेव्हा ते कसे काय रूढ होणार, म्हणून त्यांची चेष्टा झाली. परंतू ते सरकारी खात्याने रूढ केलेले शब्द नव्हते, तर एका प्रतिभावंत कवीने रूढ केलेले शब्द होते. या दोनात फरक असतो. 'मोले घातले रडाया' म्हणून सरकारात भाषाशुद्धीचे लोक बसवलेले असतात.इकडची डिक्शनरी घेऊन इकडे शब्द घाल, असं त्याचं चालू असतं. पण हा प्रतिभासंपन्न कवी होता. 'रिपोर्टर'चं भाषांतर करताना त्यांनी 'वार्ताहर' असं केलं.वार्तांचं, म्हणजे बातम्यांचं हरण करणारा, खेचून नेणारा, तो वार्ताहर...... इथे प्रतिभासंपन्न कवीची छाप दिसते. आज महाराष्ट्रात किंवा अगदी पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी सुद्धा 'मेयर' याच्यापेक्षा 'महापौर' याचा अर्थ लोकांना जास्त कळतो.



संपादक आणि वृत्तपत्रातले बाकीचे पदाधिकारी , त्यांची पदं हे सगळे आजचे रूढ शब्द सावरकरांनीच दिलेत. चित्रपट सृष्टीतल्या लोकांचे तर सगळे शब्द सावरकरच देत आहेत. दिग्दर्शक हा शब्द त्यांनी दिला., संकलक हा शब्द त्यांनी दिला. अशा त-हेने त्यांनी मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. आजही जर मुलांना ओघवती भाषा शिकवायची असेल, त्यांचं बोलणं जास्त चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे निबंध रोज मोठयाने वाचून घ्यावेत. म्हणजे वैचारिक दृष्ट्याही तो मुलगा मोठं होईल आणि भाषेच्या समृद्धीच्या दृष्टीनेही तो मुलगा मोठं होईल.त्यांच्या लेखनात विलक्षण नाट्यमयता दिसून येते. सावरकरांचे मराठी भाषेवर किती थोर उपकार आहेत हे अनेकांच्या कदाचित लक्षात सुद्धा येणार नाही. सावरकर हे साक्षात महाकवीच होते.



शतजन्म शोधिताना शातअर्ती व्यर्थ झाल्या

शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या.



इतकी विराटकल्पना या 'स्पेस एज' च्या युगातसुद्धा आधुनिक कवींपैकी कुणी केल्याचं मला आठवत नाही. आमचं प्रेम कसं होतं, त्याचं वर्णन करताना त्यांनी या ओळी लिहिलेल्या आहेत. नुसती एक सूर्यमालिका आपल्या आवाक्यांत येत नाही, इथे हा महाकवी म्हणतोय - 'शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या'; एव्हढं पाहणा-या या महाकवीनं ब्रिटिशांच्या जेलमध्ये जन्मठेपेचा एक कैदी म्हणून इथे आल्यावर काय हाल सोसले ते आपण 'माझी जन्मठेप' मध्ये वाचलेलच आहे. पण माझी खात्री आहे की त्यांनी जेवढे हाल खरोखरच सोसले असतील त्याच्या एक दशांश सुद्धा त्याच्यामध्ये लिहिले नसतील. कारण त्यामुळे लोकांच्या मनात आपल्याबद्दल जराशी सुद्धा करुणेची

भावना उत्पन्न होईल असं त्यांना संशय आला असता, तरी त्या महापुरुषाला ते आवडलं नसतं. मला नेहमी वाटतं की झालेले सगळे हाल त्यांनी त्यांच्यात लिहिलेलेच नाहीयेत. उगीच कुठल्या तरी म्हातारीने ते वाचून 'अयाई, काय गं हे हाल' असं म्हटलेलं त्यांना नको होतं. उलट त्यांना ते वाचून 'असे हाल होतात काय, ठीक आहे, मग मीही ते सोशीन' असं त्यातून स्फूर्ती घेऊन हिंमतीने म्हणत पुढे येणारे तरुण हवे होते. त्यामुळे स्वत:बद्दल कणव निर्माण करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही. वार्धक्याच्या काळात ते कुणाला भेटत नसत. इथे बाळाराव आहेत, त्यांच्या अगदी जवळ वावरलेले, त्यांना माहीत असेल नेमकं का ते. पण मला तरी असं वाटतं की आपल्या आयुष्यात थकलेल्या अवस्थेत आपल्याला कुणी पाहणं त्यांना कधी आवडलेलं नव्हतं. एखाद्या म्हाता-या सिंहालाही असंच वाटत असेल, की मला सर्कशीतला सिंह म्हणून पाहू नका, तर जंगलात ज्यावेळेला मी डरकाळ्या फोडत होतो त्यावेळेला हिंमत झाली असती तर माझ्यासमोर येऊन उभं राह्यचं होतंत.



ह्याच वृत्तीने जगल्यामुळे सावरकर त्यावेळी कुणाला भेटले नाहीत, तितकेच हसत हसत ते मृत्यूला सामोरे गेलेले आहेत.त्यांच्या विज्ञाननिष्ठेचं एकाच उदाहरण आपल्याला सांगतो. आपल्याकडे बाकी सगळ्या बाबतीत आपण पुढारलेपणा दाखवू शकतो.फक्त और्ध्वदेहिकाची जी काही पद्धत असते त्या बाबतीत आपण अगदी तर्कट असतो. आपल्याला भीती वाटत असते की जिवंतपणी तर बाप मानगुटीवर कायम बसलेलाच होता, आता न जाणो, मेल्यावरही बसायचा, म्हणून आपण ते सगळं करत असतो. ज्या सावरकरांना आपण धार्मिक, धर्मवादी, हिंदुत्वनिष्ठ......वगैरे वगैरे म्हणत दूषणं लावल्यासारखे बनवत होतो, ते सावरकर आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवतात की, 'मी मेल्यानंतर माझे शव विद्युतदाहिनीमध्ये झोकून द्यावे'. ते 'झोकून द्या' हा शब्द वापरतात. म्हणजे चक्क फेकून द्या. त्याला आता काहीही अर्थ राहिलेला नाही, असं त्यांना म्हणायचय. हे शंकराचार्यांसारखंच आहे. आद्य शंकराचार्यांच्या आईला उचलायला इतर ब्राम्हण येईनात. या छोट्या मुलाच्यानंही ते जड शव उचलवत नव्हतं. त्यावेळेला ते म्हणाले, 'हे तर काष्ठवतच झालेलं आहे'. - आणि म्हणून त्यांनी त्याचे तीन तुकडे केले, मग वाहून नेऊन त्यांनी त्याचं पुढे काय ते दहन केलं. विज्ञाननिष्ठेची हीच परंपरा सावरकरांनी दाखवली आहे. नाहीतर दुसरीकडे स्वत:ला 'सेक्युलर' म्हणवणारे पुष्कळ जण आपण मेल्यानंतर गंगेत काय करा, यमुनेत काय करा, आणखी कुठे काय करा वगैरे सगळं लिहीत बसलेले असतात.



यांना मात्र आम्ही सेक्युलर समजतो. असला सगळा तमाशा आपण नंतर करत असतो. ठाण्यातून एकदा मी मोटारीने जात होतो..... खरं तर आजच्या अशा प्रसंगी विनोदी किस्सा सांगू नये. पण तुम्ही मला बोलावलंय, तेव्हा मी माझ्या जातीवर जाणारच. राहवत नाही म्हणून सांगतो. - ठाण्यात त्या दिवशी जात असतांना पोलिसांनी माझी गाडी एकदा इकडे अडवली, एकदा तिकडे अडवली, एकदा तिकडे अडवली. मला काही कळेना का ते. मी विचारलं काय आहे हो हे? तर ते म्हणाले, उद्या या रस्त्यानं एका पुढा-याची रक्षा नेणार आहेत, त्याची ही रिहर्सल चाललीय. म्हटलं, मग रिहर्सलसाठी कुणाची रक्षा वापरताय? आडमार्गानं सुद्धा असं न करणा-या सावरकरांची थोरवी आपल्याला अनेकदा कळतच नाही. 'विद्युतदाहिनी' हा शब्दसुद्धा सावरकरांचाच आहे. तोच आता रूढ झालेला आहे. त्याच्यात माझं शव फेकून द्या, असं

ते म्हणतात. इतकंच नाही तर, त्यानंतर सुद्धा 'याचं स्वर्गात भलं व्हावं' या अर्थाचे मंत्र कुणी म्हणू नयेत असंही ते सांगतात.



ज्यांना कुणाला आपल्या मनाच्या समाधानासाठी काही गुणगुणावासं वाटेल त्यांनी हवं तर काही गुणगुणावं. पण माझं नंतरचं क्रियाकर्म कुणीही करू नये असं म्हणणारा अत्यंत 'रॅशनल' अशा प्रकारचा हा मनुष्य होता. अशा माणसाच्या बाबत अर्थीविपर्यास असंही पुष्कळदा घडत असतं. सावरकरांनी गाय ही फक्त एक उपयुक्त पशू आहे, असं म्हंटल्यावर 'गायीच्या पोटांत एकतीस कोटी देव आहेत' असं म्हणणारे लोक त्यांच्यावर केवढे भडकले होते! त्यालासुद्धा सावरकरांनी जे म्हंटलं, त्यानंतरचे सगळे अर्धवट वाचून त्यांच्यावर केलेले आरोप होते. ते जगातल्या कुठल्याही प्रकारच्या पावित्र्याला मान्यता देत नव्हते असं नव्हे. तर त्यांच्या दृष्टीने सगळ्या देशाचंच पावित्र्य महत्वाचं होतं. अहो, ज्या पुढा-यानं देव आणि धर्म यापेक्षा देश हीच संकल्पना सगळ्यांत मोठी मानली त्यांच्यापेक्षा दुसरा कुठला मोठा रॅशनल विचारच आधुनिक युगांत असू शकत नाही. त्यांचे विज्ञाननिष्ठेचे विचारच आपल्याला इथून पुढल्या जगात लागणार आहेत. त्याचं कारण;



आपल्याला यापुढे क्षणाक्षणाला विज्ञानयुगातच जगायचं आहे. त्याच्याशी जुळणारे जर आपले विचार नसतील तर चांगले सुशिक्षित, सुसंस्कृत असून सुद्धा आपण आजच्या आदीम जमातींच्या प्रमाणेच कुठेतरी फेकून दिले गेलेले, बावळट ठरू. अशा प्रकारच्या बावळटपणाचा सावरकरांना सदोदित तिटकाराच असे. त्यांना दीन, दुबळा, वाकलेला, लाचार मनुष्य सहनच होत नसे. हे कितीतरी वेळा त्यांच्या लिखाणात, त्यांच्या नाटकांत दिसून आलेलं आहे. 'तू तेजाचा पुत्र आहेस' हा संदेश सतत तुम्हाला त्यात सापडेल. त्या स्वाभिमानाचा नुसत्या उर्मटपणाशी संबंध त्यांना जोडायला नको होता. ज्याप्रमाणे लिंकनने म्हटलंय की, as I shall not be a slave, so I shall not be a master, ज्याप्रमाणे मी कुणाचा गुलाम होणार नाही, त्याप्रमाणे कुणाचा मालकही होणार नाही. 'जन्मठेपे'च्या सुरुवातीलाच असलेलं कदाचित आपण वाचलेलं असेल - त्या काळातही त्यांच्या डोळ्यासमोर कल्पना होती की सगळ्या जगाचं राष्ट्र एक व्हावं. इतकी विराट कल्पना घेऊन बसलेल्या माणसाला ब्रिटीशांचा साम्राज्यवाद किंवा आपल्या लोकांचा बावळटपणा सहन कसा होणार? आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणी ते य सगळ्याच्या विरुद्ध उभे राहिले.



नुसते उभे राहिले असे नाही, तर एखाद्या समिधेसारखा आपला देह त्यांनी त्यासाठी झिजवला. ती कृतकृत्यता त्यांच्या 'जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती' या शब्दातून दिसते. सावरकरांच्यासारखी माणसं जीवनाचा कधी निरोप घेत नसतात. ती अमर असतात. मृत्युन्जयच असतात. त्याचं एखादं वाक्य, एखादा शब्द, एखादी ओळ सुद्धा आपल्याला त्यांची आठवण करून दिल्यावाचून राहात नाही. माझ्या मते 'क्षण तो क्षणात गेलं, सखी हातचा सुटोनि' ही इतक्या श्रेष्ठ दर्जाची कविकल्पना आहे, की त्या एका ओळीकरता त्यांना नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे होता. त्यांच्या अशा एकेका निर्मितीमुळे ते चिरंजीव राहिलेले आहेत. आपण एवढंच बघायचं की, या प्रकाशातला एखादा तरी किरण आपल्या अंत:करणात पेटतो की नाही. आज त्या गाभा-यात पुष्पहार अर्पण करताना ज्याप्रकारे भरून आलं, ती भावना आपल्या मनात राहिली तर क्षूद्र गोष्टींनी आपण जे विचलित होऊन जातो, तिथे तरी आपण थोडे निर्भय होऊ शकलो तर बरं होईल. अशा निर्भयतेची उपासना करणं हेच तर आपल्या भारतीय संस्कृतीचं पहिल्यापासून स्तोत्र राहिलेलं आहे.



असं निर्भयातला निर्भय माणूस इथे जेलमध्ये हालअपेष्टा सोसत कुणासाठी राहिला? तुमच्या-माझ्यासाठीच राहिला नं? आज आपण मोकळेपणानं ज्या प्रकारे सहज म्हणून इथे येऊ शकतो आहोत ते सावरकरांच्या आणि त्यांच्यासारख्यांच्याच पुण्याईमुळे. त्या पुण्याईचं स्मरण आपण करतो म्हणून ती पुण्यतिथी असते. माणूस नुसतं मेला तर त्याचं दरवर्षीचं श्राद्ध म्हणजे पुण्यतिथी होत नाही. त्याच्या पुण्याचा जर काही वाटा आपल्यासमोर आलेला असेल तर ती पुण्यतिथी असते. सावरकरांच्याकडून आपल्याला स्वातंत्र्याचा, निर्भयतेचा वाटा आलेला आहे. स्वातंत्र्याच्या उपासनेबद्दल बोलायचं तर मी आत्तापर्यंत वाचलेल्या साहित्यातलं सर्वात सुंदर स्तोत्र म्हणजे -



'जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे........'



याच्याइतकं सुंदर स्तोत्र नाही.



माझ्या आयुष्यात अंगावर काटा उभं रहावा असं आणखी एक प्रसंग आला. सावरकरांनी ज्या अस्पृश्यांसाठी इतकी प्रचंड धडपड केली त्याच बांधवांच्याशी संबंधित एकाकार्यक्रमात मी गेलो होतो. सावरकरांनी अस्पृश्यांसाठी केलेलं काम आपल्याला माहीत असेलच - स्नेहभोजनं, मेळावे, पतितपावन मंदिर... असं मोठं काम त्यांनी मुख्यत: रत्नागिरीतून केलं होतं. त्या बांधवांचं काहीतरी चांगलं व्हावं, ते मोठे व्हावेत, शिकावेत, त्यांच्यातला भेद नाहीसा व्हावा यासाठी त्यांनी खूप धडपड केली. सांगलीजवळ म्हैसाळ नावाचं एक गाव आहे. तिथे आमचे एक मित्र मधुकरराव देवल यांनी ५० हरिजन कुटुंबांचा सहकारी शेतीचा एक प्रयोग उभं केलेला आहे. ज्या दलितांच्या घरातल्या बायका गरिबीमुळे, एकच फाटकं वस्त्र असल्यामुळे एकेकाळी घरातून बाहेर सुद्धा येत नसत, त्याच कुटुंबामधल्या बायका त्या दिवशी त्या

कार्यक्रमात जरीचे कपडे घालून आलेल्या होत्या. इतकी त्यांची त्या शेतीतून प्रगती झालेली होती. सभेला सुरुवात झाली. ते म्हणाले, या बायका आता गाणं म्हणणार आहेत. आजकाल गाणं म्हटलं की कुठलं तरी चित्रपटातलं गाणं असणार आणि मुळात जितकं भीषण गायलेलं असेल त्यापेक्षाही भीषण ऐकायला मिळणार, अशा अपेक्षेत होतो. म्हटलं, म्हणा. एकेकाळी घराबाहेर न पडणा-या आणि पडल्याच तर ज्यांची छी: थू होत होती अशा बायकांनी माझ्यासमोर गाणं कुठलं म्हटलं तर -



जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे



माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मनात आलं, हे गाणं ऐकायला माझे कान उपयोगाचे नाहीत, इथे साक्षात सावरकरच उपस्थित असायला हवे होते. म्हणजे त्याचं पुण्य कुठल्या काळात, कुठल्या ठिकाणी आणि कसं फळाला आलेलं आहे हे त्यांना पहायला मिळालं असतं. त्याचा एक क्षण जरी जरी त्यांच्या अनुभवाला आला असता तर चांगलं झालं असतं. त्याचं बीज असंही रुजलेलं आहे, त्यामुळे मारून, मरून किंवा विरुद्ध प्रचार करून ही माणसं कधी मरणारी नाहीतच. स्वयंभूपणानं ही वटवृक्षासारखी जगात असतात.



जे तीर्थक्षेत्र झालेलं आहे अशा ठिकाणी, अंदमानात आपण जमलेलो आहोत. तीर्थाची माझी अगदी साधी व्याख्या आहे. जिथे नुसत्या शरीराला स्नान घडतं त्याला आपण पाणी असं म्हणतो, पण मनाला ज्याच्यामुळे स्नान घडतं ते तीर्थ असतं. गंगेमध्ये शरीरही धुण्याची ताकद आहे आणि मनही धुण्याची ताकद आहे. म्हणून गंगा हे तीर्थ होतं. अशाच एका तीर्थस्थळी आपण जमलो आहोत. खरं म्हणजे प्रत्येक भारतीयानं इथे नतमस्तक व्हावं इतकं महान कार्य इथे घडलेलं आहे. सर्वच भारतीय भाषांमध्ये सावरकरांच्या विचारांची भाषांतरं कशी करता येतील, याचाही कार्यक्रम आपण हाती घेतला पाहिजे असं मी बाळाराव सावरकरांना म्हटलंच आहे. बाळारावानीही याचं कार्यासाठी आयुष्य वाहिलेलं आहे. त्यांना या कार्याला समर्थता लाभावी म्हणून आपल्यासारखी मंडळी त्यांच्याबरोबर आल्याशिवाय राहणार नाहीत, असा मला विश्वास वाटतो. इथल्या पुण्याईला मन:पूर्वक अभिवादन करून मी थांबतो.

*जय हिंद ".



-------------------------------------

हरी ओम | श्रीराम | प्रणव उंडे | पुणे

-------------------------------------